कॉकरोच जनता पार्टी (CJP) या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज (दि. ७) पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Abhijit Dipke | 'देशात तुम्ही किती जणांना पाकिस्तानी म्हणणार? इथं फक्त भाजपचेच भारतीय आहेत का?' : अभिजीत दिपके

आता यापुढे भारतातच राहणार, आंदोलनाची व्‍याप्‍ती महाराष्ट्रातही वाढवणार

पुढारी वृत्तसेवा

Abhijit Dipke on CJP protest : "देशातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून दरवर्षी लाखो ग्रॅज्युएट्स बेरोजगार फिरत आहेत. पेपर लीकच्या सत्रांमुळे तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत असतानाही सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले आंदोलन हा केवळ 'ट्रेलर' होता, आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र होईल," असा इशारा देत देशात तुम्ही किती जणांना पाकिस्तानी म्हणणार? इथं फक्त भाजपच भारतीय आहेत का?', असा सवाल कॉकरोच जनता पार्टी (CJP) या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज (दि. ७) पत्रकार परिषदेत केला.

दरवर्षी ३० लाख ग्रॅज्युएट्स बेरोजगार!

"आज देशात दरवर्षी सुमारे ५० लाख तरुण पदवीधर (ग्रॅज्युएट) होतात. मात्र, त्यापैकी केवळ २० लाख तरुणांनाच नोकऱ्या मिळतात. उर्वरित ३० लाख पदवीधरांना नोकरी मिळत नाही. गेल्या १०-१२ वर्षांपासून देशात केवळ धर्माच्‍या नावाखाली राजकारण सुरू आहे. या राजकारणाने कोणालाही रोजगार मिळत नाही किंवा विद्यार्थ्यांची परीक्षाही चांगली जात नाही. त्यामुळे आता सरकारने आपला फोकस बदलून शिक्षण आणि रोजगारावर काम केले पाहिजे."

देशात दररोज सरकारी परीक्षांचे पेपरफुटी होत असताना कोणाचाही राजीनामा का येत नाही?

नीट (NEET) आणि सीबीएसई (CBSE) संदर्भातील गोंधळावर बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. "प्रायव्हेट नोकरीमध्ये एक-दोन चुका झाल्या तरी कर्मचाऱ्याला काढून टाकतात. मग इथे देशात दररोज सरकारी परीक्षांचे पेपर लीक होत असताना कोणाचाही राजीनामा का येत नाही? जोपर्यंत जबाबदारी निश्चित करून राजीनामा दिला जात नाही, तोपर्यंत शिक्षण व्यवस्था सुधारेल कशी? आम्ही शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एक पूर्ण अजेंडा तयार करत आहोत," असे त्यांनी स्पष्ट केले.

'आम्हाला पाकिस्तानी म्हणणार का?'

आंदोलनाला बदनाम करण्याच्या प्रयत्नांवरून त्यांनी सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या आयटी सेलला धारेवर धरले. "सरकारला प्रश्न विचारणाऱ्या कोणालाही हे लोक पाकिस्तानी ठरवतात. मग देशातील विद्यार्थी, विरोधक आणि प्रश्न विचारणारे पत्रकार हे सगळेच पाकिस्तानी आहेत का? तर मग भारतीय नक्की कोण? फक्त आयटी सेलवालेच भारतीय आहेत का?" असा संतप्त सवाल करत जंतर-मंतरवर सिक्कीमपासून ते देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून तरुण शांततापूर्ण आंदोलनासाठी आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

'केजरीवाल नव्हे, हे युवकांचे आंदोलन!'

या आंदोलनामागे 'आम आदमी पार्टी' किंवा अरविंद केजरीवाल असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. "आमची मूव्हमेंट कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. हा राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी युवकांचा स्वतःचा लढा आहे. पाच वर्षांतून एकदा केवळ मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नाही, तर पाचव्या वर्षी मत देताना नेत्यांना प्रश्न विचारणं म्हणजे खरं पॉलिटिक्स आहे," असे दिपके म्हणाले.

फडणवीसांनी लक्षात ठेवावे ते युपीचे नाही महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाचा समाचार घेताना अभिजित दिपके म्हणाले, "जय भीमच्या घोषणा आणि आंबेडकरांचे पुस्तक यामुळे अराजकता पसरते, असे मुख्यमंत्र्यांना म्‍हणायचे आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावे की, उत्तर प्रदेशचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र हा पुरोगामी, सेक्युलर आणि विचारवंत विचारांचा आहे. अशा राज्यात आंबेडकरी विचारांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही," असेही ते म्‍हणाले.

संभाजीनगरमध्येही होणार आंदोलन

हे आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित नसून लवकरच महाराष्ट्रातही याची व्याप्ती वाढवली जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्येही लवकरच भव्य आणि शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी शेवटी केली. कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट न जोडता, युवकांच्या बळावरच हा लढा पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT