छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी मुख्य अंतर्गत जलवाहिन्यांवरील अवैध नळ कनेक्शन तोडण्याची धडक मोहीम पुन्हा कार्यान्वित केली आहे. यात मंगळवारी (दि. १९) उस्मानपुरा येथील शम्स कॉलनी ते देवानगरी रस्त्यावर मोहीम राबवून विशेष पथकाने तब्बल ११४ अवैध नळ कनेक्शन तोडले. यात एकाच ठिकाणी सुमारे २२ हून अधिक नळ अढळून आले. कारवाईवेळी नागरिकांनी विरोध केला. परंतु, पोलिस बंदोबस्तामुळे विरोध मावळला.
उन्हाळ्यात शहरातील प्रत्येक वसाहतींचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आयुक्त अमोल येडगे यांनी नुकताच पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेत अवैध नळ कनेक्शनविरोधात मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, अतिरिक्श शहर अभियंता अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता वसंत भोये, उपअभियंता किरण धांडे, पथक अभियंता रोहित इंगळे, शाखा अभियंता महेश चौधरी, कनिष्ठ अभियंता सुशील कुलकर्णी, सचिन वसावी याच्यासह कर्मचाऱ्यांनी अवैध कनेक्शनविरोधात थंडावलेली मोहीम पुन्हा सुरू केली.
या पथकाने उस्मानपूरा येथील मोरया चौक परिसरात मोहीम राबविल्यानंतर मंगळवारी पथकाने शम्सनगरमध्ये अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली. एकाच ठिकाणी २० ते २२ नळ घेण्यात आल्याचे निदर्शनास येताच ते तोडण्यात आले. प्रत्येक ठिकाणी असाच प्रकार केल्याचे दिसून आले.
कारवाई तीव्र करणार
या कारवाईत तब्बल ११४ अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यात आले. अनधिकृत नळ जोडण्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचा इशाराही मनपा प्रशासनाने दिला आहे.