10,000 Mutation Entries Pending in Sambhajinagar District
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : महसुली यंत्रणेचा कारभार पारदर्शक व गतिमान करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. मात्र या यंत्रणेतील तलाठी स्तरावरील कामकाज अजूनही कुर्मगतीने सुरू आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तलाठी स्तरावर तब्बल १० हजार ९८ फेरफार नोंदी प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात खेट्या माराव्या लागत आहेत. सर्वाधिक ३३२६ फेरफार नोंदी छत्रपती संभाजीनगर तालुक्यात प्रलंबित आहेत.
शेत जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारानंतर त्या व्यवहाराची सातबारावर नोंद घेतली जाते. या नोंदीला फेर घेणे असे म्हणतात. दस्त नोंदणीच्या व्यवहारानंतर कोणत्याही प्रकारची तक्रार नसेल तर अशा व्यवहाराची पुढील ३० दिवसात नोंद घेणे आवश्यक आहे. तलाठीस्तरा-वरुन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करुन ती संचिका पुढील मंजुरीसाठी मंडळ अधिकारीस्तरावर सादर केली जाते. मात्र, फेरफार नोंद घेण्यासाठी कालावधी निश्चित केलेला असतानाही जिल्ह्यात फेरफार नोंदी वेळेत होत नसल्याचे चित्र आहे.
तसेच काही प्रकरणात तलाठ्यांकडून शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याच्याही तक्रारी अधूनमधून येत असतात. सद्यस्थितीत जिल्ह्यात नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत अशा मालमत्तेच्या संदर्भात तब्बल १० हजार ९८ फेरफार नोंदी रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या दारात खेट्या माराव्या लागत आहेत.
यात १ महिन्याच्या आतील प्रलंबित फेरफार नोंदीच्या संख्या ७ हजार ८२३ इतकी आहे. १ ते ३ महिन्याच्या आतील कालावधीतील १०८६ नोंदी रखडल्या आहेत. तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधीच्या १३१ नोंदी प्रलंबित आहेत. तर अनोंदणीकृत किंवा विवादास्पद प्रलंबित फेरफार नोंदींची संख्या ही १०५८ आहे. ही आकडेवारी ३१ मार्च २०२६ रोजीची आहे.
गतवर्षी फेरफार अदालत
तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गतवर्षी प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करण्यासाठी फेरफार अदालतींचा उपक्रम राबविला. त्यावेळी महिनाभरात तब्बल आठ हजारांहून अधिक फेरफार नोंदी घेण्यात आल्या. मात्र त्यानंतर पुन्हा तलाठ्यांकडून फेरफार नोंदीच्या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे.