परळी वैजनाथ ; पुढारी वृत्तसेवा : विठ्ठलाच्या ओढीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हरी नामाचा गजर करत पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल होतात. अबाल, वृद्ध दिंडी घेवून पायदळ वारी काढतात. अशीच एक अनोखी वारी यावर्षी आषाढीनिमित्त यवतमाळहून पंढरपूरला जाणार आहे. ही वारी परळीत मुक्कामी होती. या वारीत धडधाकट माणसं सहभागी नसून, सर्वजण दिव्यांग दृष्टीहिन व्यक्ती सहभागी आहेत. पूर्णत: दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच स्वंत्रत वारी आहे. परळी वैजनाथ येथे ही दिंडी आल्यानंतर या दिंडीचे स्वागत करण्यात आले. तसेच सहभागी वारकर्यांना वैद्यनाथ भक्तमंडळाच्या वतीने सेवाही पुरवण्यात आल्या.
यवतमाळ येथून २५ जूनला संत सूरदास यांची प्रतिमा व पादूका घेवून या दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. आर्णी, दिग्रस, पुसद,कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजागाई, कुर्डूवाडी, पंढरपूर असा २२ दिवस ५२१ किमीचा पायदळ प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर येथे पोहचणार आहे. दररोज किमान २० ते २५ किमीचा प्रवास असून, मार्गात भजन, कीर्तन असे कार्यक्रमही हे बांधव घेत आहेत. या वारीत दिव्यांग संघाचे अध्यक्ष प्रवीण कठाळे, सेवा समर्पणचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार, दिंडीचे संयोजक दिव्यांग संघाचे संचालक सदानंद तायडे, गजानन मानकर, प्राची बनगिनवार, सोमनाथ अफुणे, बालाजी तपासकर, हनुमान डहाणे, विशाल चक्रे, गुड्डू अंबुडारे, माधव निंबलवार, प्रज्वल तुमसरे, यश गायकवाड, दुर्गा तुंबलवार, रीमा तोडकर, प्रणाली उईके, प्रमोद जगनाळे, फकीरा भालेराव, मनकर्णा यशवंत, संकेत गायकवाड आदी सहभागी झालेले आहेत.
यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांनी हा अभिनव प्रयोग केला आहे.दिव्यांग संघाचे अध्यक्ष प्रवीण कठाळे यांच्या मार्गदर्शनात संचालक सदानंद तायडे हे येथे १० ते १५ दृष्टीहिनांचा सांभाळ करतात. हे सर्व दृष्टीहीन विदर्भातील विविध जिल्ह्यांतील आहेत. ते ‘सूरचक्षु’ हा दृष्टीहिनांचा आकेस्ट्रा चालवितात.या कार्यक्रमाच्या मिळकतीतून या सर्वांचा खर्च भागविला जातो. सेवासमपर्ण प्रतिष्ठानने दिव्यांग संघाला जागा आणि राहायला खोल्या बांधून दिल्या आहेत. लागेल तशी मदत सेवा समर्पणचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार, सचिव अनंत कौलगीकर, सदस्य सुरेश राठी, डॉ. अलोक गुप्ता, दीपक बागडी हे करतात. या दृष्टीहिनांना पंढरपूरच्या वारीत घेवून जायची कल्पना सदानंद तायडे यांच्या डोक्यात आली. सेवा समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार व सचिव अनंत कौलगीकर यांनी या दृष्टीहिन बांधवांची वारीच पंढरपूरला घेवून जायचा निश्चय केला आणि सर्व तयारी सुरू केली. यावर्षी पहिलीच स्वतंत्र दिव्यांग वारी विठुरायाच्या भेटीला जात आहे.
पंढरपूर येथे राज्यभरातून वारकरी दिंडी घेवून दाखल होतात. असंख्य दिव्यांग लोकही विविध वारीतून पंढरपूरला जातात. मात्र फक्त दिव्यांगांची स्वतंत्र वारी निघण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिव्यांगांची पहिलीच स्वंत्रत दिंडी घेवून दृष्टीहिन वारकरी पंढरपूर येथे पोहोचणार असून हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण राहणार आहे. ही प्रथा यवतमाळातून सुरू होत असल्याचा आनंद आहे,- सदानंद तायडे, संचालक, दिव्यांग संघ
यवतमाळ येथुन दिव्यांग बंधू, भगिनी यवतमाळ ते पंढरपूर अशी २२ गावांचा थांबा घेत पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी पोहचणार आहे. दिव्यांगा द्वारे वारी काढण्याची कदाचित महाराष्ट्रातील पहिली घटना असावी. या वर्षी यवतमाळकर एक नाविन्यपूर्ण पर्व सुरू करीत असून दरवर्षी वाढत्या प्रमाणात वारी सुरू राहील असा दिव्यांग संघाचा मानस आहे.- प्रशांत वि. बनगिनवार, अध्यक्ष, सेवा समर्पण प्रतिष्ठान, यवतमाळ