मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रती दिंडी 20 हजार रुपये अनुदान वितरणास शासनाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील 14 जून रोजी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने सोमवारी (दि.1) शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
पुणे विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावाने दिंडीतील मानाच्या 10 पालख्यांपैकी 6 पालख्यांसोबतच्या 344 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये देण्यात येणार आहे. याप्रमाणे एकूण 68 लाख 80 हजार रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता दिली आहे. याबाबत बुधवार (दि.3) शासनादेश काढण्यात आला आहे.
मानाच्या मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थान या पालखीसोबत 119 दिंड्या आहेत. श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा (त्र्यंबकेश्वर) 52, श्री संत एकनाथ महाराज संस्थान पालखी सोहळा (पैठण) 40, श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळा (सासवड -पुणे) 32, श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान श्री क्षेत्र कौंडण्यपूर (अमरावती) 2, तर श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा (सासवड- पुणे) या पालखी सोबतच्या 99 अशा एकूण 344 दिंड्यांना या आदेशाचा लाभ होईल. उर्वरित 4 मानाच्या पालख्यांसोबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या दिंड्यांना निधी वितरीत केला जाईल, असेही या देशात स्पष्ट केले आहे.