The Latur-Kalyan National Highway should pass through Beed district.
बीड, पुढारी वृत्तसेवा प्रस्तावित लातूर-कल्याण (जनकल्याण द्रुतगती) राष्ट्रीय महामार्गाचा मूळ मार्ग बीड जिल्ह्यातूनच जावा, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आक्रमक झाले असून खासदार बजरंग सोनवणे, खासदार रजनी पाटील तसेच माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी स्वतंत्रपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रे पाठवून तीव्र भूमिका मांडली आहे.
खा. बजरंग सोनवणे यांनी २७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, लातूर-अंबाजोगाई-केज-बीड-जामखेड अहिल्यानगर-कल्याण हा मूळ प्रस्तावित मार्ग बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक, शेतीपूरक, व्यापारी व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मात्र सदर महामार्ग धाराशिव जिल्ह्याकडे वळवण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेमळे बीड जिल्ह्यावर अन्याय होण्याची शक्यता असून जनतेत तीव्र असंतोष निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र ाद्वारे विनंती करताना सांगितले आहे की, या महामार्गामुळे परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर थेट जोडले जाणार असून पर्यटन, उद्योग, वाहतूक, शेतीमालाची बाजारपेठेपर्यंत पोहोच यासाठी हा प्रकल्प अत्यंत लाभदायक ठरणार आहे. बीड जिल्हा आधीच दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, स्थलांतर अशा समस्यांनी ग्रस्त असताना हा महामार्ग जिल्ह्याबाहेर वळवणे अन्यायकारक ठरेल, प्रकल्प वळविल्यास जनतेत तीव्र असंतोष निर्माण होऊन लोकशाही मागनि आंदोलन छेडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, खासदार रजनी पाटील यांनीही लातूर-कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग) संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे भूमिका मांडत, लातूर-अंबाजोगाई केज-बीड-जामखेड-अहिल्यानगर-कल्याण हाच मार्ग तांत्रिक, भौगोलिक व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अधिक योग्य असल्याचे नमूद केले आहे. या मार्गामुळे मोठ्या लोकसंख्येला थेट संपर्क मिळतो, कृषी व व्यापारी दळणवळण सुलभ होते आणि अपेक्षित विकास साधता येतो. मार्गात बदल केल्यास या सर्व लाभांवर पाणी फिरण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमद केले आहे.
महामार्गाला विरोध करणारे 'कल्याण' साठी आग्रही
एकंदर पाहता, नियोजित लातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग बीड जिल्ह्यातूनच जावा, या मागणीवर जिल्ह्यातील खासदार, माजी मंत्री व लोकप्रतिनिधी एकवटले असून हा महामार्ग बीड जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत असतानाच दुसरीकडे हेच प्रतिनिधी मात्र 'शक्तीपीठ' द्रुतगती महामार्गासाठी रस्त्यावर उतरून सरकारला तीव्र विरोध करताना दिसत आहे. त्यामुळे अशा दुटप्पी भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या मागणीकडे मुख्यमंत्री कशा पद्धतीने पाहतात हे लवकरच कळेल.