बीड : बीड तालुक्यातील हिवरापहाडी येथील प्रधानमंत्री आवास योजना 2024-25 मध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये 51 जणांना या योजनेचा लाभ मिळाल्याची यादी समोर आली असून त्यात सरपंच, माजी उपसरपंच आणि शंभर एकर शेती असणारेही लाभार्थ्यांच्या पंगतीत बसल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर सरपंचांच्या मर्जीतील काही लोकांचाही त्यात भरणा करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
हिवरापहाडी सारख्या छोट्या गावात कोट्यवधीच्या घोटाळ्याचा डोंगर उभा राहत असल्याचे पाहून तोंडात बोटं घालण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. प्रशासन नावाची यंत्रणा बीड तालुक्यात असेल तर त्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करावी आणि दोषींवर थेट गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होऊ लागली आहे.
बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत नेमकं कुठे काय चालू आहे ? याचा ताळमेळच राहिलेला नाही. प्रधानमंत्री आवास योजना ही गोरगरिबांसाठी आहे. त्यासाठी शासनाने निकष देखील ठरवून दिलेले आहेत. जे खरोखरचं या योजनेचा लाभ मिळवून घेण्यास पात्र आहेत त्यांना तो लाभ नक्कीच मिळाला पाहिजे. मात्र बीड तालुक्यातील हिवरापहाडीमध्ये या योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोळ झाल्याचे दिसून येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना 2024-25 ची यादी समोर आली असुन त्यावर नजर टाकल्यास नक्कीच डोळे चक्रावून जातील अशी परिस्थिती आहे. हिवरापहाडीतील सरपंच अशोक सीताराम शिंदे हे देखील त्यात लाभार्थी दिसुन येत आहेत. हाऊस स्टेटस कंपलीटेड असून मंजूर रक्कम 1 लाख 20 हजार तर वितरित रक्कम 1 लाख 15 हजार रूपये दाखवत आहे. 7 ऑक्टोबर 2025 रोजी शेवटची रक्कम ट्रान्सफर झाल्याचे यादीत पहायला मिळते.
विशेष म्हणजे इनसपेक्शन डेटच्या रकान्यात 25 सप्टेंबर 2025 असा उल्लेख आहे. आता सरपंचच लाभार्थी झाले असतील तर त्यांचे नातेवाईक आणि जवळचे सुध्दा यामध्ये मागे का राहतील ? म्हणून सरपंचाच्या काकाचे नावही यादीत दिसून येत आहे. त्यामध्ये वितरीत रक्कम 1 लाख 20 हजार रूपये दाखवण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर कॉम्प्युटर ऑपरेटर, दोन मजली घरं असणारे, शंभर एकर शेती असणारे हे देखील त्यात लाभार्थी असल्याचे समोर आले आहे.
हे कमी की कायं यादीत एका मयत व्यक्तीचे नाव देखील असल्याचे दिसून येते. एकुणच प्रधानमंत्री आवास योजनेच्या आडून काही मातब्बर लोकांनीच स्वत:ची घरं भरून घेतल्याचे यादीतून पहायला मिळत आहे. यादीत पात्र लाभार्थी नक्कीच आहेत, परंतु त्यामध्ये अशी काही नावे आहेत की त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही तरीही त्यांनी गोरगरिबांच्या हक्काचा पैसा स्वत:च्या घश्यात घातल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे.