Peace today after stone pelting in Matori village
मातोरी गावात दगडफेकीनंतर आज शांतता  Pudhari Photo
बीड

जरांगे यांच्या मातोरी गावात परिस्‍थिती नियंत्रणात; गावात शांतता

पुढारी वृत्तसेवा

गेवराई पुढारी वृत्तसेवा/शिरूर : पुढारी वृत्तसेवा

गावात काल (गुरूवार) रात्री दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील होणार मोठा अनर्थ टळला. दरम्यान रात्री उशिरा पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी सोशल मीडियावर जनतेला शांततेची आव्हान केले.

ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके हे गोपीनाथ गड येथून दर्शन घेऊन भगवानगडला जाणार होते. त्यांच्या स्वागतासाठी तिंतरवणी माळेगाव येथील ग्रामस्थ दुचाकी रॅली आणि डीजे लावून पाडळशिंगीकडे निघाले होते. त्यांची रॅली मातोरी गावात आल्यानंतर रॅलीतील तरुणांनी त्या गावात डीजे लावून नाचण्यास सुरुवात केली. डिजेवर एक दोन गाणी डान्स केल्यानंतर या ठिकाणी मोठे ट्रॅफिक जाम झाले. त्यामुळे मातोरी ग्रामस्थांनी या तरुणांना येथे डीजे वाजून नका म्हणून सांगितले. त्याच कारणावरून ग्रामस्थ आणि डीजेवर नाचणार्‍या तरुणांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी रॅलीमधील काही तरुणांनी शिवीगाळ सुरू करीत एक हॉटेलवर दगड भिरकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेकीला सुरुवात झाली. यात काही जणांना मार लागला आहे, तर चार ते पाच दुचाकींवर दगड मारून त्यांचे देखील नुकसान केले आहे. डीजेचे देखील नुकसान करण्यात आले आहे. महामार्गावर गाड्या अडवून त्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार देखील घडले आहेत. घटनेची माहिती समजल्यानंतर चकलांबा पोलिस आणि बीड जिल्ह्याचे राखीव पोलीस व इतर अधिकारी यांनी तातडीने गावात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

अफवांचे पेव फुटले

प्राध्यापक लक्ष्मण हाके भगवानगडावर येणार म्हणून महामार्गावर अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांची स्वागतासाठी तयारी केली होती. मात्र इकडे असा गैरसमज निर्माण झाला की, आता दुसरा समूह आपल्या गावावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून माहिती देण्यास सुरुवात केली. परिणामी दोन्ही समाजाचे लोक मोठ्या संख्येने मातोरी परिसरात जमण्यास सुरुवात झाली. मात्र येथील कृष्णानगर येथेही दगडफेक करण्यात आल्‍याचे आज ग्रामस्थ सांगत आहेत.

हाके यांचा पुढील दौरा रद्द

हाके काल भगवानगड निघणार होते. पहाटे त्यांनी भगवानगडाचे दर्शन घेतल्यानंतर पुढील दौरा रद्द करत असल्याची घोषणा त्यांचे सहकारी पी.टी चव्हाण यांनी केली आहे. घटनेनंतर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले लाठ्या-काठ्या हातात घेण्याचा काळ गेला. गावची शांतता बिघडवू नका. आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षण संरक्षण करणार्‍या अशा दोघांनीही कादा हातात घेऊ नये, गावाची शांतता बिघडू नका असे आवाहन हाके यांनी केले.

तसेच मातोरीच्या दगडफेकीच्या घटनेचा त्‍यांनी निषेध केला. ते बीड जिल्ह्याच्या तेलगाव येथे बोलत होते. आम्ही उपोषण आणि आंदोलनाच्या मार्गाने आमची मागणी मागत आहोत. तरुणांनी कुठलाही कायदा हातात घेऊ नका. दगडफेक आणि रस्ता रोको करू नका. गाडी फोडून दहशत पसरवू नका.

कोणाकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्‍न होत असेल तर मी त्याचा निषेध करतो. संविधानावर विश्वास ठेवा. भीती बाळगू नका. पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था ठेवावी. लाथा काट्यांचा काळ गेला. गावची शांतता बिघडवू नका. भांडण आणि हिंसा उपाय नाही असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे व नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील शांतता राखण्याचे आव्हान केले आहे.

SCROLL FOR NEXT