केज: मसाजोग ग्रामपंचायत या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी विजय मिळवला. यानंतर गावात गुलाल उधळत, वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतूनच विजयी उमेदवार स्वरुपानंद देशमुख हे स्व. संतोष देशमुख यांच्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले. यावेळी दुसऱ्या कोणाचं असं झालं असतं तर गुलाल उधळला असता का? असा प्रश्न त्यांनी स्वरुपानंद यांना केला, यावर त्यांनी माझा नाइलाज होता असे उत्तर दिले, या प्रसंगाची आता मोठी चर्चा होत आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सरपंचपदाच्या निवडीसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये दि. २८ एप्रिल रोजी मतदान झाले तर दि. २९ रोजी मतमोजणी झाली.
या निवडणूकीत स्वरुपानंद देशमुख हे ९२ मतांनी विजयी झाले. यानंतर मतमोजणी केंद्र परिसरातच जल्लोष करण्यात आला. तेथून विजयी उमेदवारासह कार्यकर्ते मस्साजोग येथे पोहचल्यानंतर त्यांचे फटाक्यांच्या आतीषबाजीत आणि गुलालाची उधळण करत स्वागत करण्यात आले. स्वरुपानंद देशमुख हे मिरवणुकीसह त्यांच्या निवासस्थानी गेले, त्या ठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले.
यानंतर त्यांनी स्व. संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी देखील भेट घेतली. त्या ठिकाणी स्व. देशमुख यांच्या आईने स्वरुपानंद यांना दुसऱ्या कोणाचं असं झालं असतं तर गुलाल उधळला असता का? असा सवाल केला. यावर स्वरुपानंद यांनी माझा नाइलाज होता असे उत्तर दिले तर स्व. देशमुख यांच्या आईने तुझी बहीण होती ना? असा प्रतिप्रश्न करताच स्वरुपानंद यांनी मी कायम तुमच्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावून येईल असा शब्द दिला. या प्रसंगाची जोरदार चर्चा होत आहे.
स्व. संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन
विजयी उमेदवार स्वरुपानंद देशमुख यांनी स्व. संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तसेच देशमुख कुटूंबाच्या न्यायाच्या लढाईत आम्ही सोवत राहू, स्व. संतोष देशमुख यांचे गावच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित असलेले घनंजय देशमुख यांनी देखील नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा दिल्या.
सीएसआर फंड, परळीहून आलोय हे दोन मुद्दे चर्चेत
मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान अवादा कंपनीने दिलेला ५८ लाख रुपयांचा सीएसआर फंड, त्यातून खर्च झालेले २८ लाख रुपये याबरोबरच विरोधकांना परळीची मदत होत असल्याचा देखील छुपा प्रचार करण्यात आला होता. मतदान प्रक्रिया सुरू असताना एका कार्यकत्यनि आम्ही काय परळीहून आलो आहोत का मतदान करायला? तसे असेल तर आलो आहोत परळीहून असे म्हणत वातावरण ढवळून टाकले होते. या दोन मुद्द्यांभोवतीची ही मिरवणूक फिरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.