

Massajog Sarpanch Election Swaroopanand Deshmukh Victory: बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. गावातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवत सरपंचपदावर कब्जा केला. त्यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव केला.
या निकालामुळे मस्साजोग गावातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गावात सहानुभूतीची लाट असल्याचं मानलं जात होतं. त्यामुळे अश्विनी देशमुख यांना मोठा पाठिंबा मिळेल, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष निकालात स्वरूपानंद देशमुख यांनी बाजी मारत सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवले.
डिसेंबर २०२४ मध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग गावातील वातावरण प्रचंड ढवळून निघालं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर सरपंचपद रिक्त झालं आणि त्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक पातळीवरील निवडणूक न राहता प्रतिष्ठेची लढत बनली होती.
गावात दोन स्पष्ट गट पडले होते. एका बाजूला सहानुभूतीच्या लाटेवर निवडणूक लढवणाऱ्या अश्विनी देशमुख होत्या, तर दुसऱ्या बाजूला अनेक वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले स्वरूपानंद देशमुख मैदानात होते.
स्वरूपानंद देशमुख हे मस्साजोग गावातील अनुभवी आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गावातील स्थानिक प्रश्न, ग्रामपंचायत पातळीवरील विकासकामे आणि सामाजिक संपर्क यामुळे त्यांनी स्वतःचा स्वतंत्र जनाधार तयार केला होता.
विशेष म्हणजे ही त्यांची पहिली मोठी राजकीय लढत नव्हती. यापूर्वीही त्यांनी संतोष देशमुख यांच्या विरोधात सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांचा अत्यंत थोड्या फरकाने म्हणजेच अवघ्या ९ मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी त्यांनी अधिक ताकदीने मैदानात उतरत विजय मिळवला.
या निवडणुकीत सहानुभूतीचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल, असं मानलं जात होतं. मात्र निकाल पाहता स्थानिक राजकीय समीकरणे, गावातील गटबाजी आणि उमेदवाराची वैयक्तिक पकड अधिक प्रभावी ठरल्याचं दिसून आलं. स्वरूपानंद देशमुख यांनी गावातील विविध घटकांना एकत्र आणत प्रचार मोहीम राबवली होती. त्याचा फायदा त्यांना मतदानात झाल्याचं बोललं जात आहे.
विजयानंतर आता मस्साजोग ग्रामपंचायतीची धुरा स्वरूपानंद देशमुख यांच्या हाती आली आहे. गावातील राजकीय संघर्षानंतर विकासकामांना गती देणं, गावातील तणाव कमी करणं आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणं हे त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. मस्साजोगमधील ही निवडणूक केवळ एका गावापुरती मर्यादित राहिली नाही, तर बीड जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणातही तिची जोरदार चर्चा होती.