Bride fakes marriage for money in Beed
वडवणी, पुढारी वृत्तसेवा
वडवणी तालुक्यातील उपळी येथील २८ वर्षीय तरुणांकडून एका टोळीने तीन लाख रुपये घेत लग्न लावून दिले, लग्न लावून दिल्यानंतर सत्यनारायण पूजाच्या दिवशीच नवरीने कांगावा करत मैत्रिणींच्या साह्याने वडवणी पोलिसांना घेऊन घर गाठले. व ड्रामा करत नवरदेवाविरुद्ध कारवाई करण्याची धमकी देत वडवणी पोलीस स्टेशन गाठले. मात्र नवरीच्या नातेवाईकांचा संशय आल्याने हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आला व नवरदेवाच्या फिर्यादीवरून नवरीसह पाच जणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या लग्नासाठी मुली भेटत नसल्याने अनेक तरुण लग्नाविना रखडले आहेत. लग्नासाठी मुली भेटत नसल्याने पालक स्थळाचा शोधा शोध करत आहेत. असेच एक प्रकरण वडवणी तालुक्यातील उपळी येथील एका २८ वर्षीय तरुणाला ऊसतोडणीला कर्नाटक येथे असताना ओळख झालेल्या सेलू येथील एका महिलेने लग्नाचे स्थळ आणले. मुलगी पाहण्यासाठी मुलगा आपल्या कुटुंबासह सेलू येथील मध्यस्थी महिलेच्या घरी गेले. त्या ठिकाणी मुलगी व मुलीचे नातेवाईकांची ओळख करून देण्यात आली. मुलगी पसंत झाल्यानंतर ३ लाख रुपयाची मागणी मुलांकडे करण्यात आली. सर्व कुटुंबीयांनी एकत्रित निर्णय घेत तीन लाख रुपये देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे दि. १ जून रोजी नवरीकडील नातेवाईक व मध्यस्थी महिला असे बनावट टोळी मिळून मारोती सुझुकी कारमधील लोक मुलाच्या घरी उपळी (ता. वडवणी) येथे आले.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे नवरी मुलीच्या नातेवाकांना अडीच लाख रुपये दिले व त्या मध्यस्थी महिलेला पन्नास हजार दिले. व त्या मुलीला नवरदेवाच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले व ते सर्व निघून गेले. उपळीतील मुलाच्या नातेवाईकांनी मोजकेच पाहुण्यांमध्ये धुनकवड येथील महादेव मंदिरामध्ये लग्न लावून देण्यात आले. लग्न होऊन दोन दिवस झाल्यानंतर सत्यनारायण पूजा चे आयोजन करण्यात आले होते. मात्र नवरी मुलीने सत्यनारायण पूजेच्या दिवशीच ड्रामा करत कांगावा केला व एका महिलेला फोन करून बोलून घेतले. आपली मैत्रीण असल्याचे भासवून पोलिसांसमोर कांगावा करत माझ्या मैत्रिणीच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून दिले असल्याचा आरोप करत पोलिसांना घेऊन उपळी गाव गाठले. नवरदेव त्याचे नातेवाईक व नवरी मुलीला घेऊन पोलीस वडवणी पोलीस स्टेशनला घेऊन आले.
पोलिसांनी दोन्ही कुटुंबांची आधी चौकशी केली. नवरी मुलीच्या नातेवाईकाची कसून चौकशी केली असता हा सगळा फ्रॉड असल्याचे लक्षात आले.नवरदेवाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाच्या फिर्यादीवरून नवरीसह पाच व्यक्ती विरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या बनावट टोळीने खोटा विवाह लावून अनेकांना फसविल्याचा संशय असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यापैकी तीन आरोपी अटक करण्यात आली असून तिघे फरार आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर.डी राठोड करत आहेत.
खोटा विवाह लावून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश पास केला असून यामधील तीन आरोपींना अटक करून माजलगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीदरम्यान अनेक प्रकरणे समोर येणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.