Life-threatening attack on a Kirtankar who demanded a weekly financial account
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील ठाकर अडगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या हिशोब विचारल्याच्या कारणावरून कीर्तनकार कैलास राजेंद्र आनंदे महाराज यांच्यावर पाच ते सात जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१३) सकाळी जातेगाव रोड परिसरात घडली. लोखंडी रॉड, केबल वायर, लाकडी दांडे तसेच धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या या अमानुष मारहाणीमुळे धार्मिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकर अडगाव येथील रहिवासी व कीर्तनकार कैलास आनंदे महाराज हे बुधवारी सकाळी सुमारे १० ते १०.१५ वाजेच्या दरम्यान गे वराई शहरालगतच्या जातेगाव रोड परिसरात एकटे असताना काही जणांनी त्यांना अडविले. अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब का विचारला असे म्हणत आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि संबंधितांनी आनंदे महाराज यांच्यावर अचानक हल्ला चढविला. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, केबल वायर आणि दांडक्यांनी बेदम मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता 'याचा संतोष देशमुख करा' अशी धमकी देत दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये हल्लेखोरांची हालचाल स्पष्ट दिसत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर वारकरी संप्रदाय, कीर्तनकार मंडळी आणि ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या हिशोबाच्या कारणावरून एका कीर्तनकारावर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या प्रकरणी संबंधित गेवराई पोलिसांनी जवाब नोंदवला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत आहे.
महाराजांवर उपचार सुरू
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कैलास आनंदे महाराज यांना तातडीने उपचारासाठी बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर मार लागल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.