Heavy rain lashed the Talni area
तळणी, पुढारी वृत्तसेवाः मंठा तालुक्यातील तळणी परिसरात बुधवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सुमारे दोन तास पडलेल्या या पावसामुळे उकाडा कमी होण्यास मदत झाली आहे. पाऊस पडूनही पुरेशी ओल न गेल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
जून महिना संपत आला तरी मंठा तालुक्यातील तळणी परिसरात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत पडला होता. परंतु, बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तब्बल एक तास दमदार पावसाने हजेरी लावली. पहिल्याच मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, गेल्या काही दिवसांपासून सोसाव्या लागणाऱ्या प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बुधवारी झालेल्या एका तासाच्या दमदार पावसामुळे गुरुवारपासुन शेतकरी शेतीकामांच्या नियोजनात व्यस्त होणार आहेत. मात्र, हा पाऊस पेरणीयोग्य आहे का, याबाबत शेतकरी अजूनही चाचपणी करत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत जर परिसरात असाच आणखी पाऊस झाला, तरच प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात होऊ शकते. पावसाची सरासरी आणि जमिनीतील ओलावा पाहूनच शेतकरी पेरणीचा अंतिम निर्णय घेतील.
चारा आणि पाण्याचे संकट कायम !
बुधवारच्या पावसामुळे आशेचा किरण निर्माण झाला असला, तरी संकट पूर्णपणे टळलेले नाही. या पावसात पुढील काळात सातत्य राहिले, तर एक ते दीड महिन्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई दूर होऊ शकते. परंतु, जर पावसाने पुन्हा खंड दिला, तर मात्र या परिसरात चारा टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच शासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.