Fertilizer price hike hits; Increase of Rs 250 per 50 kg
टाकरवन: अतिवृष्टीच्या संकटातून सावरत असलेल्या बळीराजाच्या खांद्यावर रब्बी हंगामाच्या तोंडावर खतदरवाढीचे नवे संकट कोसळले आहे. रासायनिक खतांच्या दरात ५० किलो गोणीमागे तब्बल २०० ते २५० रुपयांची वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. अपुरी भरपाई, रखडलेल्या पेरण्या आणि अनिश्चित हवामान अशा तिहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांचे गणित अक्षरशः विस्कटले असून असंतोषाचा भडका उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
खरीपातील अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची कास धरून सावरण्याची आशा होती. परंतु खताच्या अचानक झालेल्या दरवाढीने आर्थिक नियोजनाचा पाया डळमळला आहे. शासनाकडून मिळालेली मदत अपुरीच असून एकीकडे अतिवृष्टीचे नुकसान, तर दुसरीकडे दरवाढ शासन देतंय की घेतंय? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
परतीचा पाऊस लांबल्याने बांधावरील कामे विलंबात आहेत. पेरणी रखडल्यास उत्पादनक्षमता कमी होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात. खतदरवाढीने रब्बीची पेरणीच धोक्यात आली आहे, असे अनेकांचे मत आहे. खतदरवाढीने शेतकरी अक्षरशः होरपळून निघत आहे.
खर्च दररोज वाढतोय, उत्पादन कमी होतेय-परिणामी शेती तोट्यात जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असल्याचे शेतकरी सुंदर शिंदे यांनी सांगितले.
उत्पादन खर्चात प्रचंड वाढ
खत महागल्याने आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणखी फुगणार आहे. परंतु शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने नफ्याची तर गोष्ट दूरच, गुंतवणूक परत मिळेल का याबाबतच शंका निर्माण झाली आहे. फळभाज्या, डाळी, गहू, हरभरा आणि इतर रब्बी पिकांच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे गणित आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.