Beed News : पावसाअभावी वाढ खुंटली, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव File Photo
बीड

Beed News : पावसाअभावी वाढ खुंटली, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव

दुबार पेरणीचे संकट; खर्च वाया जाण्याची भीती, वन्यप्राण्यांकडून नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Crop growth slowed down due to lack of rain, double sowing crisis

शिवनाथ जाधव

टाकरवण : माजलगाव तालुक्यातील टाकरवन व परिसरातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरिपाचा हंगाम चांगलाच आव्हानात्मक ठरत आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. ढगाळ हवामान असून फक्त रिमझिम पडत आहे. परिणामी कापूस, सोयाबीन यासारख्या प्रमुख पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.

पावसाच्या अभावामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. काही भागांत पिकांची मुळे सडू लागली आहेत, तर काही ठिकाणी पिके पिवळी पडत असल्याचे चित्र आहे. सोयाबीन पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. सामान्यतः जून-जुलै महिन्यांमध्ये या भागात ५०० मिलिमीटर पावसाची अपेक्षा असते. मात्र यंदा केवळ १०० ते १५० मिलिमीटर पाऊस झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. विहिरी कोरड्या पडत चालल्या आहेत आणि नदी-नालेही अजून भरलेले नाहीत. टाकरवणसह परिसरातील ९० टक्के क्षेत्रात कापूस व सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र आता पिके वाचवणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

या संकटात भर म्हणून हरीण व इतर वन्यप्राण्यांचे कळप रात्रीच्या वेळी शेतामध्ये घुसून कोवळी पिके फस्त करत आहेत. या प्राण्यांच्या संख्येमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून, वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांनी आधीच बियाणे, खते, औषधे यावर हजारो रुपये खर्च केले आहेत. पावसाचा लवकर होणारा उशिर अजून वाढला, तर संपूर्ण हंगाम हातचं जाईल अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

पावसाअभावी यंदा खरिपाची परिस्थिती बिकट झाली आहे. शिवाय हरिणीसारखे वन्यप्राणी रात्रीच्या वेळी पिकांवर धाडी टाकून नुकसान करत आहेत. ही पिकं जगवायची कशी, असा प्रश्नच आहे.
- हनुमान वराट, शेतकरी, टाकरवण
पावसाळ्याचे दोन महिने सरले तरीही पाणी टंचाई कायम आहे. विहिरी कोरड्या पडत आहेत. अशा स्थितीत पिकं वाचवणं खरंच कठीण आहे.
- पांडुरंग कदम, शेतकरी, रामनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT