आष्टी ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साधेपणाने व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन मान्य करत केळसांगवी येथील माजी सरपंच गंगाधर पडोळे यांनी गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले. या उपक्रमाचे कौतुक करत आमदार सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांनी सामाजिक भान जपत गावाच्या शैक्षणिक विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.
आ. धस यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लांब अंतर पार करावे लागते. अशा परिस्थितीत सायकल ही त्यांच्यासाठी शिक्षणाची महत्त्वाची सोय ठरत असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती मिळणार आहे.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आ. धस म्हणाले की, जिल्हा परिषद शाळा या गोरगरीब विद्यार्थ्यांचे ज्ञानमंदिर असून त्या टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज झाल्या पाहिजेत. शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा सुधारणा व गुणवत्ता वाढीसाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, गावातील शैक्षणिक वातावरण सुदृढ करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात वस्त्यांमध्ये विखुरलेले वास्तव्य वाढल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलींची गरज निर्माण झाली असून गंगाधर पडोळे यांनी राबवलेला हा उपक्रम अनुकरणीय आहे.डिजिटल युगाचा संदर्भ देताना त्यांनी पालकांना आवाहन केले की, विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर योग्य कारणांसाठीच करू द्यावा. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आवश्यक असली तरी त्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे.
यावेळी संदीप खकाळ यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष रमेश गावडे, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक जे. एस. भगत यांनी मानले. केळसांगवी येथे पार पडलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.