Beed Solar power projects and sand mafias
बीड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गोर- गरीब, भूमिहीन व अनुसूचित जाती-जमातीतील कास्तकरी शेतकऱ्यांच्या गायरान जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या नावाखाली बळकावल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा गंभीर आरोप बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी कोणाचेही नाव न घेता, बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
पत्रकार परिषदेत बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यातील अनेक कास्तकरी १९७८ पासून गायरान जमीन कसत असून त्या जमिनी मशागत करून सुपीक केल्या आहेत. शासन नियमानुसार १९९० पूर्वीपासून ताब्यात असलेल्या भूमिहीन व गरीब कास्तकऱ्यांच्या नावावर जमिनी नोंद होणे अपेक्षित आहे. महसूल कार्यालये व ग्रामपंचायतींकडे तशा नोंदी असतानाही अनेक ठिकाणी जमीन हक्क प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.
या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही राजकीय व भूमाफिया प्रवृत्ती सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित महसूल अधिकारी व प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संगनमताने गरिबांना बेदखल करण्याचे प्रकार सुरू असल्यास ते तत्काळ थांबवावेत, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, तसेच याप्रश्री आपण कोर्टात धाव घेणार आहोत, असा इशारा देण्यात आला.
तसेच माजलगाव, गेवराई व परळी तालुक्यातील वाळू ठेक्यांवर मोठ्या यंत्रसामग्रीद्वारे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोपही पत्रकार पत्रकार परिषद परिषद व निवेदनात करण्यात आला. शासन आदेशानुसार मजुरांमार्फत व सीसीटीव्ही देखरेखीखाली वाळू उपसा होणे आवश्यक असताना पोकलेन, जेसीबी आदी यंत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याचे सांगण्यात आले. ओव्हरलोड वाहतूक, जीपीएस यंत्रणेचा अभाव आणि स्थानिकांना धाक दाखवण्याचे प्रकार सुरू असल्याने शासनाचे मोठे नुकसान होत असून अपघातांची शक्यता वाढत असल्याचे नमूद करण्यात आले.
वाळू उपसा पूर्णपणे सीसीटीव्ही निगर राणीखाली करावा, नियंत्रण जिल्हाधिकारी व तहसील प्रशासनाकडे ठेवावे, सर्व वाहनांना जीपीएस बसवावे आणि यंत्राऐवजी मजुरांमार्फत काम करावे, अशी ठोस मागणी करण्यात आली.
यावेळी बहुजन विकास मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ससाणे, ज्येष्ठ नेते श्रीहरी नाना मोरे, ज्येष्ठ नेते नवनाथ आण्णा धाईजे, कार्याध्यक्ष विनोद शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष जयदीप तांगडे, शेख बाबा, सचिन जावळे, विशाल वक्ते, यांची उपस्थिती होती. कलेक्टर एसपींची प्रतिमा चांगली, त्यांनी कारवाई करावी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची स्वच्छ, पारदर्शक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी जिल्ह्यात चांगली प्रतिमा आहे.
त्यामुळे गायरान जमिनीवर नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात येणारे सौर ऊर्जा प्रकल्प तसेच बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांविरुद्ध कठोर, निष्पक्ष आणि ठोस कारवाई होईल, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांत गायरानधारक, भूमिहीन व गोर-गरीब कास्तकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. नियम डावलणाऱ्यांवर कारवाई करून गरिबांना न्याय देणे हीच प्रशासनाच्या विश्वासार्हतेची खरी कसोटी ठरेल.