केज : श्रावण महिन्यात गोदावरीचे पवित्र पाणी आणून देवाला जलाभिषेक करण्यासाठी मंदिरात गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा उघड्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट २०२६) पहाटे चारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
जिवाचीवाडी येथील युवराज आसाराम चौरे (वय २२) हे श्रावण महिन्यातील पारंपरिक जलाभिषेकासाठी गोदावरी नदीचे पाणी आणण्याची सेवा पार पाडत होते. गावातील नारद स्वामी मंदिरात दररोज एका व्यक्तीने गोदावरीचे पाणी आणून देवाला अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार युवराज गुरुवारी रात्री दुचाकीवरून माजलगाव तालुक्यातील मोगरा शिवारात गेले. तेथून गोदावरीचे पाणी घेऊन ते गावात परतले. शुक्रवारी पहाटे सुमारे चार वाजता ओल्या वस्त्रांमध्ये अत्यंत भक्तिभावाने ते नारद स्वामी मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी गेले होते. मात्र, मंदिराच्या गाभाऱ्याजवळ जमिनीवर पडलेल्या उघड्या वीजवाहक तारेला त्यांचा पाय लागला. विजेचा तीव्र धक्का बसताच ते जागीच कोसळले.
घटनेनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी युवराज यांना तातडीने धारूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. धारूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता जिवाचीवाडी येथील काळअंबा वस्तीवरील शेतात शोकाकुल वातावरणात युवराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
युवराज चौरे यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. ऐन तारुण्यात झालेल्या त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे जिवाचीवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.