परळी वैजनाथ : ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील शेतकरी कुटुंबातील चैतन्य सुभाष राडकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याची असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्ती झाली आहे. चैतन्यच्या या यशामुळे गाढे पिंपळगावसह परळी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात त्याचे कौतुक होत आहे.
चैतन्यचे प्राथमिक शिक्षण गाढे पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर परभणी येथील सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर गांधी विद्यालयातून त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अकरावी-बारावीचे शिक्षणही त्याने परभणीतच पूर्ण केले. पारंपरिक शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत चैतन्यने IIT मद्रासच्या ऑनलाइन बीएस्सी डेटा सायन्स अभ्यासक्रमालाही सुरुवात केली. या अभ्यासक्रमासोबतच त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. पुढे परळी येथील विवेकानंद महाविद्यालयात बीएस्सी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.
यूपीएससीच्या परीक्षेची सखोल तयारी करण्यासाठी तो लातूर येथे गेला. तेथे पदवीचे शिक्षण, ऑनलाइन डेटा सायन्स अभ्यासक्रम आणि यूपीएससी नागरी सेवा तसेच CAPF परीक्षांची तयारी असा दुहेरी-तिहेरी अभ्यासक्रम त्याने सातत्याने सुरू ठेवला. अभ्यासातील सातत्य, नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर चैतन्यने CAPF परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्याने देशातील प्रतिष्ठेच्या केंद्रीय सेवेत मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.
ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनत केली, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठे यश मिळवू शकतो, याचा आदर्श चैतन्यने आपल्या कामगिरीतून घालून दिला आहे. चैतन्यच्या यशाची माहिती मिळताच गाढे पिंपळगावसह परळी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ, शिक्षक, मित्रपरिवार आणि नातेवाइकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षार्थींसाठी चैतन्यचे यश प्रेरणादायी ठरणार आहे.