Beed News: Even in the Age of AI, the significance of the art of carving on stone or tiles remains undiminished
गोविंद खरटमोल
अंबाजोगाई : आज देशात विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन अत्यंत वेगाने पुढे जात आहे. रोबोट तथा एआयच्या माध्यमातून शंभर हाताचे काम दहा हातावर आणले आहे. मात्र अशाही परिस्थितीत देशाचा सांस्कृतिक कणा काही मंडळींच्या वतीने जोपासला जात आहे. कसबे परिवार हे एक असेच नाव आहे की ज्यांच्याकडून दगडावर किंवा फरशीवर कोरीव काम करत हस्तलिखित शिल्पकलेचा अजोड नमुना हा जोपासला जात आहे. आजच्या डिजिटल युगात देखील कसबे यांच्या हस्तलिखित शिल्पकलेला जोरदार मागणी असून त्यावरून आजदेखील ही शिल्पकला आपले अस्तित्व टिकवून असल्याचे दिसून येत आहे.
नारायण (रमेश) वाल्मीक कसबे हे गेली ३५ ते ४० वर्षांपसून दगडावर किंवा फरशीवर नाव तथा नक्षीकाम कोरून आपला उदरनिर्वाह करित आहेत. त्यानी त्यार केलेल्या कोनशिला आजही शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालय, मंदिर, घर त्याचबरोबर समाधी स्थळावर पहायला मिळत आहेत. त्यांनी तयार केलेल्या कोनशिलेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या भारताच्या संविधान प्रास्ताविका यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
नारायण कसबे यांनी कोणत्याही दगड किंवा फरशीवर छन्त्री व हातोडीच्या साह्याने कोरीव काम करून कोनशिला ज्या ठिकाणी लागणार आहे ते ठिकाण किंवा परिसर जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. त्यांनी आजपर्यंत जवळपास ७ ते ८ हजार हस्तलिखित कोरीव कोनशिला तयार करून त्यांच्या हस्तकलेचा तथा शिल्पकलेचा अजोड नमुना मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील पोहचविला आहे. कसबे यांनी केवळ मराठी भाषेतच नाही तर हिंदी, इंग्रजी, उर्दू, त्याचबरोबर कानडी भाषेत देखील कोनशिला बनवण्याचे कसब अंगी बाळगले आहे.
शिखर शिंगणापूर येथील ज्योतिर्लिंग मंदिराच्या ठिकाणी देखील नारायण कसबे यांनी तयार केलेली हस्तलिखित कोनशिला आपणास पहावयास मिळते. नारायण कसबे यांची कला पाहून त्यांच्या या हस्तकलेच्या सन्मान भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. नारायण वाल्मिक कसबे यांचीच कला पुढे जोपासण्याचे काम त्यांची पुढील पिढी करत आहे. अतुल नारायण कसबे व अजय नारायण कसबे ही त्यांची दोन मुले कोनशिलेवर कोरीव काम करण्याचे काम किंवा कला जोपासत आहेत.
आजच्या एआयच्या वैज्ञानिक युगात देखील अतुल व अजय हे दोन बंधू कोनशिला बनवण्याचे काम करून कसबे परिवाराची सांस्कृतिक धुरा पुढे जोपासण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. नारायण कसबे व त्यांची अतुल व अजय ही दोन वारस ही कला जोपासत असताना कधीही व कुठल्याही प्रसिद्धीच्या झोतात आली नाहीत. त्याच्या या हस्तकलेची शासन दरबारी नोंद होऊन कसबे कुटुंबाचा सन्मान व्हावा हीच त्यांनी आजवर केलेल्या कामाची पावती ठरणार आहे.
आपल्या देशाला प्राचीन अशी संस्कृती आहे. या संस्कृती मुळेच जगात आपला देश हा अत्युच्च शिखरापर्यंत पोचला आहे. देशाची हीच प्राचीन संस्कृती जोपासण्याचे व पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असल्याचे अतुल व अजय यांनी सांगितले. अतुल व अजय हे दोघेही उच्चशिक्षित असून आपल्या इतर दैनंदिन व्यवहारासोबतच आपल्या वडिलांसोबत ही हस्तकला जोपासण्यात अग्रेसर असल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया अतुल व अजय कसबे यांनी दिली.