माजलगाव - माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी येथे वीज तारांमुळे शेतातील उसाला आग लागून तब्बल पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकरी एकनाथ माळेकर, हनुमंत माळेकर व भानुदास माळेकर यांच्या शेतातील ऊसाला अचानक आग लागली. वीज तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे किंवा ठिणगी पडल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने पाच एकर क्षेत्रातील उभा ऊस पूर्णपणे जळून खाक झाला.
ऊस जळाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वीज वाहिन्यांची योग्य देखभाल व दुरुस्ती वेळेवर झाली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसानग्रस्त ऊस क्षेत्राचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, महावितरणने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.