बीड ः मार्च-एप्रिलमध्येच टँकरसाठी ओरड होणाऱ्या बीड जिल्ह्यात मेच्या मध्यापर्यंत एकही टँकर सुरू झालेले नाही. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने हे सुखावह चित्र बीड जिल्ह्यात दिसत आहे. तर वडवणी, अंबाजोगाई, केज, परळी, धारूर या तालुक्यातील 34 गावांमध्ये टंचाई जाणवत असल्याने 108 विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागात टंचाईची भिषणता अधिक असते. पिण्यासाठी आणि सांडपाणी म्हणून वापरण्यासाठी पाणीच नसल्याने पाच-सहा किलोमीटरवरुन डोक्यावर हंडे आणण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर येत असायची. यावर उपाययोजना म्हणून शेकडोंनी टँकर सुरू करण्याची वेळ बीड जिल्हा प्रशासनावर यायची.
केवळ टँकर सुरु करावे म्हणून आंदोलन, रस्ता रोको करण्याची वेळ ग्रामस्थांवर यायची, असे चित्र अनेकदा बीडकरांनी पाहिलेले आहे. गतवर्षीमात्र झालेल्या जोरदार पावसामुळे हे चित्र बदलले आहे. यावर्षी मे महिना अर्धा झाला तरी अद्यापपर्यंत एकही टँकर बीड जिल्ह्यात सुरु झालेले नाही.
वडवणी, अंबाजोगाई, केज, परळी, धारुर या तालुक्यातील चौतीस गावांमध्ये टंचाई जाणवत असल्याने परिसरातीलच विहीर अथवा बोअरचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी प्रशासनाकडून 108 विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मे महिना अर्धा झाला असतांना बीडमध्ये टँकर सुरु नसल्याचे चित्र सर्वसामान्यांनाही दिलासादायकच आहे.
तालुकानिहाय विहीर अधिग्रहण संख्या
वडवणी तालुक्यातील सहा गावांकरिता 29 बोअर, विहीर अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. अंबाजोगाईच्या सहा गावांकरिता तेरा, केजच्या चौदा गावांकरिता 43, परळीच्या 2 गावांकरिता 2, धारूरच्या 6 गावांकरिता 21, अशा पद्धतीने 34 गावांकरिता 108 बोअर आणि विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.