Maharashtra Weather Pudhari
महाराष्ट्र

Maharashtra Weather: पुणे-नाशिकसह 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा, पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Weather Alert Orange Alert Rain Hailstorm: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अचानक बदललेल्या हवामानामुळे वादळी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपीट यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. हवामान विभागाने परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे, तर उर्वरित भागात ‘यलो अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे.

या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक परिणाम उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांवर दिसून येत आहे. विशेषतः जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, येथेही वीजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यातील परिस्थितीही काहीशी गंभीर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या भागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपीट होण्याचा अंदाज असून, याचा थेट परिणाम शेतीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, लातूर, नांदेड आणि इतर काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. मात्र, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने या भागांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि अचानक पावसाच्या सरी अनेक ठिकाणी कोसळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी मोकळ्या जागेत जाणे टाळावे, झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

एकूणच, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यात वादळी पावसाचा जोर वाढला असून, हवामानातील हा अनपेक्षित बदल पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून परिस्थितीचा अंदाज घेत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

SCROLL FOR NEXT