नागपूर: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, श्रीनगरहून मुंबईकडे विशेष विमान सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, 24 एप्रिल रोजी हे विमान श्रीनगरहून मुंबईच्या दिशेने उड्डाण करणार आहे.
या विशेष विमानाने महाराष्ट्रातील सुमारे 83 नागरिकांची मुंबईकडे सुरक्षित ने-आण केली जाणार आहे. ही सेवा इंडिगो एअरलाईन्सद्वारे चालवली जाणार असून, नागरिकांच्या घरवापसीसाठी हे एक मोठे पाऊल ठरणार आहे.
राज्यातील नागरिक सध्या काश्मीरमध्ये अडकले आहेत, त्यांच्या संख्येचा विचार करता, केवळ एकच विमान अपुरी ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन आज (24 एप्रिल) रोजी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या मोहिमेसाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील पुढाकार घेतला असून, त्यांनी संपूर्ण सहकार्य दिले आहे. राज्य शासनाच्या मदतीने आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात येत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या विशेष विमानांचे संपूर्ण खर्च राज्य सरकारकडून केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. या निर्णयामुळे काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. शासनाच्या या कृतीमुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या प्रियजनांना पुन्हा भेटण्याची संधी मिळणार आहे.