Maharashtra Rain Forecast September 2026 Pudhari
महाराष्ट्र

Maharashtra Rain: पावसाची प्रतीक्षा संपणार की संकट वाढणार? पुढील 3-4 दिवस अत्यंत महत्त्वाचे, तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज

Maharashtra Rain Forecast September 2026: मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांसह पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Rahul Shelke

Maharashtra Rain Forecast September 2026: मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पावसाअभावी अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर असून, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पशुधनासाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये तरी पाऊस चांगली साथ देणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ऑगस्टमध्ये पावसाने घेतलेल्या मोठ्या विश्रांतीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची तूट निर्माण झाली आहे. विशेषतः मराठवाड्यात परिस्थिती चिंताजनक असून, खरीप पिकांवर त्याचा परिणाम होत आहे. आता परतीच्या पावसाआधी सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडतो, यावर आगामी रब्बी हंगामाचे चित्रही काही प्रमाणात अवलंबून राहणार आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज

सप्टेंबर महिन्याबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांच्या मते, यंदा सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास खरीप पिकांवर संकट वाढू शकते. उत्पादनात घट होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना आवश्यक ओलावा देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

पुढील 3 ते 4 दिवस महत्त्वाचे

दरम्यान, सप्टेंबरच्या सुरुवातीलाच राज्यातील काही भागांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो.

ओडिशाच्या दिशेने तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत आहे. त्याचबरोबर दक्षिण गुजरातपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत वाऱ्याची द्रोणीय रेषा निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे 2 सप्टेंबरच्या संध्याकाळपासून राज्यातील विविध भागांत पावसाच्या हालचाली वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जोरदार पाऊस पडला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सध्या अनेक भागांमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आगामी काही दिवसांत चांगला पाऊस झाला, तर पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळण्याबरोबरच जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होईल.

याशिवाय पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाल्यास पिण्याचे पाणी आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटू शकतो. आगामी रब्बी हंगामासाठीही हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या पावसाकडे शेतकरी मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.

एकीकडे पुढील काही दिवस पावसाची शक्यता, तर दुसरीकडे सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. अशा दुहेरी परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आगामी काळ महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT