

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. काही ठिकाणी तुरळक पाऊस व्हायचा. त्यानंतर कडक उन्ह पडत होते. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. लांजा, खेड, मंडणगडसह रत्नागिरीत रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. चोवीस तासांत ६१.८३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळै जिल्ह्यात भात, नाचणी पिकांची चांगली पुर्नलागवड झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात मोठी निराशा
उद्दिष्टापेक्षा भात, नाचणी लावणी झाली आहे. पिके ही बहरली आहेत. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी निराशा केली आहे. अपेक्षापेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे भात, नाचणी पिकांना धोका निर्माण झाला असून किटक, गोगलगायचा प्रार्दुभाव पडत असल्याचे सांगण्यात आले.
सरासरी २ हजार ४५३ मि.मी. पाऊस
दरम्यान, सप्टेंबर उजाडला असून मध्यरात्री पावसाने दमदार हजेरी लावली. लांजा, रत्नागिरी, मंडणगड, खेड तालुक्यात पाऊस जास्त पडत आहे. जिल्ह्यात सरासरी २ हजार ४५३ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी ३ हजार २६० मि.मी. पाऊस झाला होता. ८०० मि.मी. पाऊस यंदा कमी पडला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर वाढतो की ऑगस्टसारखीच परिस्थिती निर्माण होते, हे लवकरच कळेल.