Vidhan Parishad Election Result 2026 Pudhari
महाराष्ट्र

Vidhan Parishad Election Result 2026: विधान परिषदेत महायुतीची एकहाती सत्ता; 17 पैकी 16 जागांवर विजय, नाशिकमध्ये गणित बिघडलं

Vidhan Parishad Election Result 2026: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीने 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.

पुढारी वृत्तसेवा

Vidhan Parishad Election Result 2026: महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवला आहे. यापैकी 6 जागांवर उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित 11 जागांसाठी मतदान पार पडले. या 11 पैकी 10 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.

मात्र, नाशिक मतदारसंघात महायुतीला धक्का बसला. भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) समर्थित उमेदवाराचा पराभव केला.

18 जून रोजी या निवडणुकांसाठी मतदान झाले होते. राज्यभरात सरासरी 99.02 टक्के इतके विक्रमी मतदान नोंदवण्यात आले. भंडारा-गोंदिया मतदारसंघात तब्बल 100 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील लोकप्रतिनिधींनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.

महायुतीमध्ये भाजपने 11, शिवसेनेने 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने 2 जागांवर उमेदवार दिले होते. निकालांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व जागा जिंकल्या. शिवसेनेला मात्र नाशिकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

Vidhan Parishad Election Result

नागपूर मतदारसंघात भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पोतदार यांना 682 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवाराला केवळ 130 मते मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेसकडे अपेक्षेपेक्षा अधिक मतदार असतानाही त्यांना त्याचा फायदा मिळवता आला नाही.

Vidhan Parishad Election Result

या निवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. दुसरीकडे महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले मजबूत संघटन आणि प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषद ही 78 सदस्यांची असते. प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी काही सदस्य निवृत्त होत असल्याने टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक, आमदार आणि राज्यपाल नियुक्त सदस्य अशा विविध घटकांमधून विधान परिषद सदस्यांची निवड केली जाते.

या निवडणुकीच्या निकालामुळे राज्यातील आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीचा वाढता प्रभाव आणि विरोधकांची कमकुवत होत चाललेली स्थिती याची स्पष्ट झलक या निकालातून पाहायला मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT