पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येला गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पाचोर येथे सोमवारी (दि. ८) सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव कार थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकली. या अपघातात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. तर १ जण गंभीर जखमी झाला.
पाचोर पोलीस स्टेशनच्या प्रभारी आकांक्षा शर्मा यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास झालेल्या अपघातात अत्तार रमिला, अमीन अत्तार आणि भगवान दगडू पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलदार तांबोळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अनिल पाटील गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
कारमधील सर्व लोक कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते कारने उत्तर प्रदेशातील अयोध्येहून महाराष्ट्रात परतत होते. दरम्यान, राजगड जिल्ह्यातील पाचोर जवळील सारेडी गावाजवळ कारचा अपघात झाला. भरधाव असलेली कार थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
यात कारमधील पाचपैकी चौघांचा मृत्यू झाला. एक गंभीर जखमी झाला आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर शाजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी इंदूरला हलविण्यात आले. कारमधील सर्व जण एकाच कंपनीत काम करत होते. ते सर्व जण अयोध्या सहलीवर गेले होते.
रविवारी संध्याकाळी अयोध्येहून परतत असल्याची माहिती भगवान पवार यांनी दिली होती. तेच गाडी चालवत होते. अपघात एवढा भीषण होता की, दरवाजा अडकल्याने पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढले.