विशाळगड : पुढारी वृत्तसेवा
शाहुवाडी तालुक्यातील शिरगाव येथे वन्यप्राण्यांनी अक्षरशः ‘रात्रीस खेळ’ करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कडवी नदीकाठच्या गट क्रमांक ११२१ मधील ‘मळी’ नावाच्या शिवारात मका पिकावर वन्यप्राण्यांनी हल्ला चढवत काढणीला आलेले पीक रातोरात जमीनदोस्त केले.
येथील शेतकरी संतोष शामराव पाटील आणि केशव बाळू पाटील यांनी मेहनतीने उभे केलेले सुमारे बारा गुंठे क्षेत्रातील मका पीक एका रात्रीत नष्ट झाल्याने ते हवालदिल झाले आहेत. डोळ्यादेखत सोन्यासारखे पीक मातीमोल झाल्याने केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक धक्काही शेतकऱ्यांना बसला आहे.
या भागात नदीकाठ असल्याने रानडुकरांसह इतर वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अलीकडील काळात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काढणीच्या टप्प्यावर आलेले पीक नष्ट झाल्याने ‘हाता-तोंडाशी आलेला घास’ हिरावला गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे बळीराजाचे आर्थिक कंबरडे मोडले असून, पिकाच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याची खंत स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.
वनविभागाने केवळ कागदी प्रक्रिया न करता प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.