Sahyadri Tiger Reserve forest fire case accused in forest custody
विशाळगड (कोल्हापूर) : सुभाष पाटील
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील निसर्गसंपदा आणि वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण करणाऱ्या वणवा प्रकरणातील मुख्य आरोपी बापू बाजू चौगुले याला रत्नागिरी न्यायालयाने १६ मेपर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. वनसंपत्तीचे नुकसान आणि शासकीय मालमत्तेची चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे वन विभागाने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असल्याची माहिती आंबा वनक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर यांनी दिली.
आंबा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निवळे आणि गोठणे नियतक्षेत्रात काही दिवसांपूर्वी भीषण वनवा लावण्यात आला होता. याप्रकरणी कोतोली धनगरवाडा (ता. शाहूवाडी) येथील बापू बाजू चौगुले याला वनविभागाने ताब्यात घेतले होते. निवळे येथील वनवा आणि शासकीय ट्रॅप कॅमेरा चोरी प्रकरणी शाहूवाडी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र, गोठणे नियतक्षेत्रातील वणव्याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल असल्याने, आंबा वनपरिक्षेत्राच्या पथकाने आरोपीला न्यायालयाबाहेर ताब्यात पुढील कार्यवाही केली.
आरोपीला रत्नागिरी न्यायालयात हजर केले असता, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या काळात वणवा लावण्यामागचा नेमका उद्देश काय होता आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा सखोल तपास वन विभाग करत आहे.
कारवाई क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, उपसंचालक स्नेहलता पाटील आणि सहायक वनसंरक्षक संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासाचे नेतृत्व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर करत असून, त्यांना वनपाल सुरेश चरापले, मनिषा देसाई, वनरक्षक राजेंद्र बनकर, विशाल पाटील, रोहिदास पडवळे, अंजली नवले, कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील जैवविविधता आणि नैसर्गिक संपत्ती धोक्यात आणणाऱ्यांविरुद्ध कोणतीही गय केली जाणार नाही. कायद्यानुसार अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई सुरूच राहील.प्रदीप कोकितकर, वन परिक्षेत्र अधिकारी आंबा