जयसिंगपूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येवून ३४०० ते ३४५० पर्यंत पहिली उचल देत आहेत. सदरची उचल आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत केलेल्या ३७५१ रूपयाबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होवून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश देऊन ७ नोव्हेंबर रोजी निगवे (ता.करवीर) येथून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.
कोल्हापूर येथे राजू शेट्टी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बैठक घेतले यावेळी ते बोलत होते. शक्ती पुढे म्हणाले, सांगली , कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांचेसोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढावी अशी आमची अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार व कारखानदार या मुद्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. जाहीर केलेली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी सर्व शेतकरी संघटना, कारखानदार व प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे मागणी केली आहे.
गतवर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळविले आहेत. यावर्षी सुध्दा साखर, इथेनॅाल, मोलॅसिस, बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. काटामारी व रिकव्हरी चोरीतून शेतक-यांची लूट केली जात आहे. हंगामाच्या सुरवातीस कारखानदार गुंडाकरवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. यामुळे शेतक-यांनी ऊसाला चांगला भाव पाहिजे असल्यास संघटित होवून आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल.
यावेळी राजेंद्र गड्ड्यानावर, अजित पोवार, सचिन शिंदे, तानाजी वठारे, धनाजी पाटील, जयकुमार कोले, बाजीराव पाटील, अजित पाटील, बाळासाहेब पाटील, प्रभू भोजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.