गुडाळ : (आशिष पाटील) राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज (रविवार) पहाटे पासून होणाऱ्या धुवाधार अतिवृष्टीमुळे दुपारी चार वाजता राधानगरी धरण 79.57% म्हणजे जवळपास 80 टक्के भरले आहे. विशेष म्हणजे पहाटे पासून दहा तासात धरणामध्ये तब्बल तीन टक्के पाणी संचय वाढला आहे.
रविवारी पहाटे सहा वाजता धरणाची पाणी पातळी 336.41 होती तर धरण 76.61% एवढे भरले होते. पहाटे सहा पासून दहा तास झालेल्या दमदार पावसामुळे आज सायंकाळी चार वाजता पाणीपातळी 337.80 वर पोचली, तर धरण 79.57% एवढे भरले. रविवारी पहाटे सहा वाजता 6406:41 दशलक्ष घनमीटर असलेला पाणीसाठा रविवारी दुपारी चार वाजता 6631:20 द.ल. घ.मि. एवढा होता.
गेले काही दिवस धरणाच्या विद्युतगृहासाठी 1450 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. साधारणपणे हा विसर्ग धरण भरल्यानंतर उघडणाऱ्या स्वयंचलित दरवाजापैकी एका दरवाजा मधून होणाऱ्या पाणी विसर्गा एवढा आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या आठवडाभरात धरण भरण्याची शक्यता आहे.