महाड : श्रीकृष्ण द.बाळ
गेल्या 48 तासात महाड आणि पोलादपूरमध्ये पडणाऱ्या अतिवृष्टीने पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने पहिला भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारा काही वेळापूर्वीच दिला आहे. दरम्यान महाबळेश्वर व पोलादपूर येथे मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने महाड पोलादपूरकरांसाठी आजची रात्र धोक्याची असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. (Raigad Rain)
मागील 48 तासात महाड, पोलादपूर तालुक्याच्या सर्व ग्रामीण भागांमध्ये तसेच शहरात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून सद्यस्थितीमध्ये महाडच्या महिकावती मंदिराजवळ असणाऱ्या शासकीय यंत्रणेनुसार सध्याची या ठिकाणची पाणी पातळी सहा पूर्णांक 50 एवढी झाल्याने नगरपालिकेकडून इशाऱ्याचा पहिला भोंगा नागरिकांसाठी वाजविण्यात आला आहे. (Raigad Rain)
महाड तालुक्याच्या रायगड वाळण परिसरामध्ये तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून, वाळण विभागात एका (62 वर्षीय) ज्येष्ठ नागरिकाचा ओढ्यात पडून वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली. (Raigad Rain)
मागील 48 तासात होणाऱ्या तुफानी मुसळधार पर्जन्यवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे महाबळेश्वर येथेही गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलादपूर तालुक्यात पडणाऱ्या पावसाने धोक्याची पातळी ओलांडण्याची माहिती तेथील पुढारी प्रतिनिधी मार्फत देण्यात आली आहे. (Raigad Rain)
या दोन्ही तालुक्यात स्थानिक प्रशासन येणाऱ्या सर्व आव्हानात्मक परिस्थितीला सज्ज असल्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाडमध्ये असणाऱ्या एनडीआरएफ च्या पथकाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Raigad Rain)
महाड किल्ले रायगड मार्गावरील गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेला लाडवली पुलाचे काम पूर्ण झाल्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाची नोंद घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गावरून छोट्या वाहनांमधून जाण्यासाठी हा मार्ग खुला केल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील सुमारे पाच हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील सुमारे एक महिन्यापासून या पुलाच्या झालेल्या विलंबाच्या कामाने नागरिकांना सात दिवस पर्यायी मार्गावरून सुमारे पाच किलोमीटर लांब प्रवास करून महाड शहरामध्ये जावे लागत होते. (Raigad Rain)
दरम्यान महाडचे आमदार भरत शेठ गोगावले व माजी नगराध्यक्ष सौ स्नेहल जगताप कामत यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
तीन वर्षांपूर्वी 22 च्या मध्यरात्री आलेल्या महापुराने मागील शतकातील महाडच्या महापुरा संदर्भातील इतिहास खोडून काढून सुमारे 34 तासापेक्षा जास्त बारा फुटाचे पाणी शहरांमध्ये शिरले होते. अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले होते. याच दुर्घटनेमध्ये तालुक्यातील तळीये गोळे कोंड येथे झालेल्या अपघातात मोठी मनुष्यहानी झाली होती. (Raigad Rain)
या पार्श्वभूमीवर महाड मधील स्थानिक प्रशासन पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती या दोन्ही विभागांकडून देण्यात आली असून जनतेने शासनाच्या सूचनांचे पालन करावे व सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. (Raigad Rain)