Shirol Taluka Soil Transport Issues
कवठेगुलंद : शिरोळ तालुक्यातील आलास, शेडशाळ आणि औरवाड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियंत्रित माती वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवस-रात्र धावणाऱ्या ओव्हरलोड डंपर आणि हायवा वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून अपघातांच्या छायेत नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
माती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताडपत्री नसल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात माती सांडत आहे. त्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांना समोरील रस्ता दिसणे कठीण होत असून दुचाकीस्वारांच्या डोळ्यांत माती जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना श्वसनाचे विकार, खोकला आणि डोळ्यांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, माती वाहून नेणारे डंपर बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने धावत असतात. अनेक वाहने क्षमतेपेक्षा अधिक माती वाहतूक करत असल्याने रस्त्यावर मातीचे ढिगारे साचतात. परिणामी दुचाकी घसरून लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहेत. त्यामुळे हे रस्ते नागरिकांसाठी अक्षरशः ‘मृत्यूचे सापळे’ ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अवजड वाहने रहिवासी भागातूनही वेगाने धावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र संबंधित कंत्राटदार, डंपर चालक किंवा वाहतूकदारांवर आरटीओ अथवा पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे.
विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. डंपरवर ताडपत्री सक्तीची करावी, वाहतुकीसाठी वेळ निश्चित करावी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून प्रश्न सोडवला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.