म्हासुर्ली; दिगंबर सुतार : रवी तसा मितभाषी स्वभावाचा मुलगा. जमीनजुमला नसल्याने त्याच्या कुटुंबाला केवळ रोजगाराचाच आधार होता. अगदी लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपले. शिक्षणाची मनात आस असली तरी त्यास दारिद्रयाची साथ होती. त्यामुळे तो कसाबसा बारावी पर्यंतच शिकला. एकीकडे रवीचे काय होणार? कसे होणार? हा सर्वांना प्रश्न लागून राहिला होता. तर रवी रोजंदारी करुण आजी-आजोबासह कसाबसा आपला निर्वाह करत होता. त्यातच आजोबांना अर्धांगवायुने घेरले अन् रवीवर अस्मानी संकटच कोसळले.
संबंधित बातम्या :
दरम्यान, सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांचा या परिसरात उदय होवू लागला. येथील लाल मातीतील युवकांच्या रांगड्या कलागुणांना वाव मिळू लागला. रवीही चपळ वृत्तीचा, चालाख बुद्धीचा. त्याचे हेच गुण हेरुण त्यास येथील सराव केंद्रात प्रवेश मिळाला. सराव करत भरतीत उतरू लागला. कधी कधी येणारे अपयश पाहता रवी खचू नको लगे रहो या मार्गदर्शकांच्या सल्ल्याने तो पुन्हा पळत राहिला. अखेर रवी मुंबई पोलीस बनला आणि त्याच्या संघर्षमय जीवनाला न्याय मिळाला.
रवींद्र बळवंत सुतार हा म्हासुर्ली येथील युवक. त्याचीच ही कहाणी अशीच या मागासलेल्या परिसरातील गरीब प्रवर्गातील मुले घडवण्यात येथील सैनिकी प्रशिक्षण केंद्रानी मोलाचा वाटा उचलला आहे. या संस्था लोकांच्या कौतुकास पात्र ठरत आहेत. रस्त्यांच्या जाळ्यांनी आज शहराशी जोडले असले तरी मागील सात आठ वर्षापूर्वीचा काळ धामणी खोऱ्यास दुर्गम प्रवासाचाच ठरला. ना शिक्षणाचा उद्घार ना विकासाचा आरंभ, त्यामुळे आजवर या परिसरास मागासलेपणाचा डाग लागला. तरुण युवा वर्ग ही राष्ट्राची संपत्ती आहे, असे बोलले जात असले तरी येथील युवक परिस्थितीनुसार दिशाहिन होवून बॅकफुटरच राहिला. आपल्या परिसराची ही एक सल होती. डोंगरदऱ्यातील लाल मातीतील युवकांच्या रांगड्या गुणांना नक्कीच वाव मिळणार त्यामुळे जी मनात सल होती त्याचे संधीत रुपांतर करुन येथील काही युवकांनी सैनिकी प्रशिक्षण केंद्रांची स्थापना केली. पोलीस भरती असो वा सैन्य भरती असो अगदी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून येथून शेकडो युवक, युवतींच्या करियरला दिशा मिळू लागली. एक-एक म्हणता प्रत्येक भरतीत भागाचा डंका वाजू लागला. मागील सात आठ वर्षाच्या काळात येथील सव्वाशेवर मुला मुलींनी तर पोलीस, आर्मी भरतीसह सनदी अधिकारी पदापर्यंत मजल मारत यशाला गवसणी घातली आहे.
हेही वाचा :