बिरू व्हसपटे
शिरढोण : खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या वाढत्या किंमती आणि खत वितरणासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनलाइन अटींमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खत खरेदीसाठी सातबारा उतारा आणि आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ खर्च करावा लागत आहे.
अनेक कृषी सेवा केंद्रांवर खतांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी खत टंचाईचा फायदा घेत अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. तसेच अनुदानित खतांसोबत इतर कृषी उत्पादने खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
खतांच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढला असून खरीप हंगामाचे नियोजन बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळेवर आणि योग्य दरात खते उपलब्ध न झाल्यास पेरणीवर परिणाम होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबरोबरच वितरण प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ऑनलाइन प्रक्रियेतील अडथळे दूर करावेत आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मनस्ताप होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या..
खत खरेदीसाठी सातबारा उतारा आणि आधार क्रमांकाची सक्ती कमी करावी, सर्व प्रकारची खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, अधिक दराने विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी आणि अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.