'गोकुळ'मध्ये दुग्ध कलश पूजन प्रसंगी दोन नेत्यांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांना उद्देशून केलेले जाहीर आवाहन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. सततच्या संघर्षाचा उल्लेख करत मुश्रीफ यांनी पाटील यांना आपल्या सोबत येण्याचे आवाहन केले. त्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना वेग आला आहे.
kolhapur Gokul Politics news
कोल्हापूर: आशिष पाटील
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर पालिकेच्या मतमोजणीला शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली होती. साडेदहाला निकालाचे कल येऊ लागले आणि महापालिकेच्या निवडणुकीत परस्पर विरोधात आघाडी केलेले पालकमंत्री प्रकाश आबिटकर हसन मुश्रीफ आणि आ. सतेज पाटील गोकुळ शिरगावमध्ये गोकुळच्या दुग्ध कलश पूजन कार्यक्रमात व्यासपीठावर बसून महापालिका निकालाची अपडेट घेत होते.
गोकुळने 20 लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव येथे दुग्ध कलश पूजन समारंभ आयोजित केला होता.
मतमोजणीचा कल महायुतीच्या बाजूने दिसू लागल्यानंतर दोन्ही मंत्र्यांचे चेहरे खुलत गेले तर सातत्याने मोबाईल वर निकालाची अपडेट घेत असलेल्या आ. सतेज पाटील यांच्या चेहऱ्यावरील नाराजीच्या छटा स्पष्ट दिसू लागल्या.
समारंभात भाषण करताना आ. पाटील यांनी आता गोकुळच्या जनरेटरचे उद्घाटन करताना दोन्ही मंत्र्यांनी नारळ वाढविला. मात्र जनरेटरचे बटण माझ्या हस्ते सुरू करण्यात आले, तेव्हा गोकुळच्या जनरेटरचे बटण माझ्या हातात आहे, हे लक्षात घ्या, असा सूचक इशारा दोन्ही मंत्रीद्वयांना दिला.
मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात आ. सतेज पाटील यांना उद्देशून, 'अहो किती संघर्ष करताय? आता तरी आमच्याकडे या' म्हणत त्यांना थेट महायुतीत येण्याचे निमंत्रण दिले. तेव्हा आ.सतेज यांनी दोन्ही हात जोडून हसतच नकारार्थी मान हलवली आणि पालकमंत्र्याकडे निर्देश करत आधी यांचं आणि केपींचे मिटले का? सांगा अशी व्यासपीठावरूनच विचारणा केली.
आबिटकर यांनी नेहमीप्रमाणे संयमी भाषण करीत आम्ही व्यासपीठावरील नेते मंडळी काल एकमेकांच्या विरोधात होतो. आता उद्या जिल्हा परिषदमध्ये ही विरोधात राहू. मात्र गोकुळ मध्ये पक्षीय धोरण न आणता दूध उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कारभार करीत आहोत असे प्रतिपादन केले.
एकंदरीत एका बाजूला महानगरपालिकेच्या निकालाचा ताणतणाव जाणवत असताना गोकुळ च्या व्यासपीठावर सुरू असलेल्या राजकीय जुगलबंदीमुळे वातावरण हलकेफुलके राहिले.