कोल्हापूर : पुणे येथील दुर्घटनेनंतर जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात धडक कारवाई केली. २२ गुन्हे दाखल करुन १५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणे येथे विषारी दारु प्राशन केल्यामुळे १५ जणांचा बळी गेला. यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाने सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात छापेमारी सुरू ठेवली.
दानोळी (शिरोळ), माणगाववाडी, (ता. हातकणंगले), जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर शहर, गडहिंग्लज येथील १५ ठिकाणांवर रविवारी छापे टाकण्यात आले. यामध्ये हातभट्टीचे दारू अड्डे जमिनदोस्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ११ पथकांनी ही कारवाई केली आहे.