धामोड (कोल्हापूर), पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या धामोडमध्ये दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ही लढत येथील पारंपारिक प्रतिस्पर्धी सदाशिव नवणे आणि जयसिंग खामकर व एल एस पाटील गटात होणार असून नवणे गट सत्ता स्थापन करणार की खामकर पाटील गट बाजी मारणार याकडे राधानगरी तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे .
धामोड ग्रा. पं. वर अनेक वर्षापासून नवणे गटाची सत्ता आहे. ही लढत तेरा सदस्य व लोकनियुक्त सरपंच अशा चौदा जागांसाठी होणार असुन दोन्ही गटाकडून सक्षम उमेदवार दिल्यामुळे लढतीत चुरस वाढली आहे. नवणे गटाकडून सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून रेश्मा नवणे आहेत तर जयसिंग खामकर आणि एल एस पाटील गटाकडून डॉ. शोभा बिडकर या उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती दोन्हा गटाकडून देण्यात आली आहे.
आज दोन्ही गटांकडून प्रचार शुभारंभ करण्यात आला असून खामकर गटाच्या सर्व उमेदवारांनी गावाच्या विकासातील एक रुपयाचाही गैरव्यवहार करणार नसून पुढील पाच वर्षे स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे गावाचा सांभाळ करून भ्रष्टाचार मुक्त कारभार करू अशी धामोडचे ग्रामदैवत भानोबाची शपथ घेत प्रचार शुभारंभ केला.
या ग्रामपंचायत निवडणुकीवर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची समीकरणे ठरणार असल्याने दोन्ही गटाकडून अस्तित्व पणाला लावले आहे. यावर्षी धामोड मधील जनता कोणाच्या बाजूने कौल देते याकडे राधानगरी तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे.
.हेही वाचा