कासारवाडी, पुढारी वृत्तसेवा : येथील परिसरातील उच्च दाबाच्या वीज जोडणीचे खांब शेतीमधून गेले आहेत. या खांबावरून लोंबकळत असलेल्या धोकादायक विद्युत तारा शेतकरी, शेतमजुरांसाठी त्रासदायक ठरत असल्याने परिसरातील शेतकरी डोक्यावर मरण घेऊन शेतात काम करत आहे. कासारवाडी येथील बाजारवाट रस्त्यालगत नारायण वागवे, शंकर वागवे, राजाराम माने, अजित माने या शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतामधून विद्युत खांब व त्यावरून ओडलेल्या विद्युत तारा जमिनीपासून अवघ्या पाच ते सहा फुटावर लोंबकळत आहेत. विद्युत वाहिनी बंद असली तरी लोंबकळणार्या विद्युत तारा व वाकलेले खांबामुळे शेतकऱ्यांना, शेतमजुरांना काम करताना डोक्याला स्पर्श करतात. त्यामुळे मशागती करताना शेतात यंत्रे शेतात जात नाहीत.
लोंबकळत असलेल्या विद्युत ताराबाबत टोप येथील महावितरण कार्यालयात एक वर्षापासून लेखी व तोंडी अनेक वेळा तक्रार देऊनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. महावितरणच्या अशा गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांनी व जनावरांनी आपले जीव गमवले आहेत. कोणाला तरी इजा अथवा अपघात झाल्यावरच महावितरणचे डोळे उघडणार काय असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.