जत; पुढारी वृत्तसेवा : जत विस्तारित सिंचन योजनेच्या कामाची टेंडर काढा या मागणीसाठी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने शासन दरबारी आंदोलन करूनही शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे येत्या शुक्रवारी (दि. २५) कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सीमेवर समितीचे शेकडो कार्यकर्ते दंडवत घालणार आहेत. कर्नाटक सरकारला तुमच्या राज्यात समावेश करून घेण्यासाठी साकडे घालण्यात येणार आहे. त्यानंतर उमदी बसस्थानक जवळील नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी दिली आहे.
पोतदार म्हणाले, जत तालुक्यातील पाणी प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने बघ्याची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाची दुर्दैवी वेळ आली आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जानेवारी महिन्यात उमदी येथे भेट देवून समितीच्या बैठकीत जत विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना अमलात आणून दीड वर्षात जतच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी आणू मात्र आपण कर्नाटक राज्यात जाण्याचा विचारही करू नका असे आश्वासन दिले. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी विस्तारित सिंचन योजनेला दोन हजार कोटी रुपये मंजूर केले आणि तत्काळ 981कोटी रुपयांची टेंडर काढले. आता पाण्याचा प्रश्न मिटणार आणि कामाला सुरुवात होणार या आशेने पाहत असताना टेंडर काढून आठ महिने झाले तरी अद्याप कामाला सुरू केली नाही. त्यामुळे दीड वर्षात जतच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी आणतो म्हणणाऱ्या मंत्र्यांना आठ महिने ओलांडले तरी कामाला सुरुवात करता आली नाही. तर दीड वर्षात पाणी काय पोहोच करणार? म्हणून आम्ही 9 ऑगस्ट क्रांती दिनी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तरीही शासनाचे डोळे उघडायला तयार नाही. मंत्री उदय सामंत यांना स्मरण पत्र पाठवून आठवण करून दिली आहे. त्याचाही परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे आम्ही येत्या शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर जावून कर्नाटक राज्यात समावेश करावा म्हणून दंडवत घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दंडवत घालण्याच्या कार्यक्रमानंतर उमदी बसस्थानक जवळील नगर विजयपुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
तालुका पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, उपाध्यक्ष अनिल शिंदे, निवृत्ती शिंदे, महमद कलाल, चिदानंद संख , तानाजी मोरे, गोपाल माळी, अरविंद मुंगळे, केशव पाटील, तात्या कोळी, रियाज शेख, सिद्धू मडवळे, श्रीमंत परगोंड, कलाप्पा इंगळगी, सागर नागने, आपू कोरे, कामु बालगांव, मलाप्पा परगोंड, आदी उपस्थित होते