किणी, पुढारी वृत्तसेवा: सलग आलेल्या सुट्ट्या व वर्षाअखेरमुळे पुणे- बंगळुरू महामार्गावर तसेच किणी टोल नाक्यावर आज (दि.२३) वाहनांची प्रचंड गर्दी झाली. यामुळे काही वेळा टोल यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती. Kolhapur
शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळ अशी सलग तीन दिवस सुटी आली आहे. त्यातच वर्षा अखेर असल्यामुळे पर्यटनासाठी पुण्या-मुंबईचे पर्यटक सहकुटुंब मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शाळांसह खासगी कंपन्यांनाही पाच ते दहा दिवसांच्या नाताळ सणाच्या सुट्ट्या आहेत. या सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी नागरिक शनिवारी मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. Kolhapur
अनेक जण या सुट्टयांसाठी कोकण, गोवा आदी ठिकाणी चालले आहेत. त्यामुळे या भागात जाणाऱ्या पर्यटकांमुळे शनिवारी पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. रात्री उशीरापासूनच गोव्यासह, चेन्नई, बंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची गर्दी होत होती. यामुळे काही काळ टोलनाक्यांवर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. महामार्गावरील हॉटेल्स, धाबे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. तर महामार्गावरून धावणाऱ्या एसटी बसेस, खासगी गाड्या फुल्ल असल्याचे दिसून आले.
गोव्यात मोठ्या प्रमाणात असणारा नाताळचा सण व ३१ डिसेंबर व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणे, मुंबईसह इतर राज्यातील पर्यटकही गोव्याला पसंती देत असतात. महामार्गावरून बेळगाव, आजरा- आंबोली मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात आहे.
हेही वाचा