कोल्हापूर

कोल्हापूर : नृसिंहवाडीत अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात नागरिक एकवटले

अविनाश सुतार

नृसिंहवाडी; विनोद पुजारी : सेवाभावी संस्था आणि  नागरिकांनी एकजूट करून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास सामुदायिक विरोध नोंदवण्याचा निर्णय रविवारी (दि.२) घेतला. याबाबत ग्रामपंचायत सदस्य विभूते यांच्या निवासस्थानी बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लवकरच सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी तसेच नागरिकांचे शिष्टमंडळ भेटणार आहे.

अलमट्टीची उंची सध्या 519.66 मीटर आहे. ती वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय उच्चस्तरीय बैठकीत कर्नाटक शासनाने घेतला आहे. याकरिता आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली असून त्यास न्यायालयाची परवानगी ही मिळणार असल्याचे समजते. सांगली महापूर समिती तसेच महापूर अभ्यासक विजयकुमार दिवाण, अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे या प्रमुख नेत्यांनी याकरता जोरदार विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिराला महापुराचा मोठा फटका गेल्या काही वर्षापासून बसत आहे. अलमट्टी धरण झाल्यापासून कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा नद्यांना महापूर येतो. येथील दत्त मंदिरात पाणी जलद गतीने चढते. परंतु पाणी संथ गतीने उतरते. तर दुसरीकडे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक शासनाने घेतला आहे. त्यामुळे पावसाळ्यात मंदिर बराच काळ पुराच्या पाण्यात राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, देवस्थान व सेवाभावी संस्था यांनी संयुक्तपुणे अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात लढा उभारणे आवश्यक आहे. येथील नागरिकांनी सह्यांची मोहीम हाती घेतली असून या सह्यांचे निवेदन शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी रविवारी बैठक घेतली असून या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी 'दैनिक पुढारी' च्या प्रतिनिधीने अलमट्टी धरण स्थळाला भेट देऊन छायाचित्रासह प्रत्यक्ष वार्तापत्रे प्रसिद्ध केली होती. धरणाला जोडणारे रस्ते मोठ्या प्रमाणात उंच असून या धरणाखाली खोलवर काही गावे असल्याचे चित्र दिसून येते. तसेच हिप्परगी धरण, मांजरी भराव, जुगुळ या गावी नवीन होत असलेला पूल या बाबी महापूर तसेच पाणी लवकर न उतरण्यास कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलमट्टी धरणाच्या उंचीच्या विरोधात आम्ही रविवारी बैठक घेतली. नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पुढल्या आठवड्यात देण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत. दत्त मंदिराला महापूरपासून कायमचा असलेला धोका टाळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
– अमोल विभुते, ग्रामपंचायत सदस्य, माजी देवस्थान अध्यक्ष

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT