Kalammawadi Dam
गुडाळ : आशिष ल.पाटील
धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीत असलेल्या गळतीमुळे 2022 नंतर जाणीवपूर्वक पाणीसाठा कमी ठेवलेले काळम्मावाडी धरण चार वर्षानंतर जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून बुधवारी सकाळी दहा वाजता धरणात 99.90% पाणीसाठा झाला आहे. विद्युत निर्मितीसाठी धरणातून 1200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
आंतरराज्य प्रकल्प असलेल्या काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीमुळे 2022 नंतर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत नव्हता. मात्र यावर्षी गळती काढण्याचे काम जवळपास 50 टक्के पूर्ण झाल्याने जलसंपदा विभागाने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसंचय करण्याचा निर्णय घेतला होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली.
काळम्मावाडी धरणाची पाणी साठवणूक क्षमता 646 मीटर आणि 25.39 टीएमसी इतकी आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता पाणी पातळी 645.98 मीटर आणि 25.36 टीएमसी झाल्याने धरण 99.90% भरले आहे.
गेली चार वर्षे धरणात पाणीसाठा अपूर्ण असल्याने उन्हाळ्यात लाभक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवत होती. शिवाय धरणातून थेट पाईपलाईनने कोल्हापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा होत असलेला पुरवठाही या वर्षीच्या उन्हाळ्यात खंडित झाला होता. आता काळम्मावाडी पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रात समावेश असलेल्या जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील गावच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईन मार्फत उन्हाळ्यात अखंडित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.