सुभाष पाटील
विशाळगड : कडवी खोऱ्याची जीवनदायिनी आणि शाहूवाडी तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करणारे कडवी धरण शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी ६ वाजता १०० टक्के भरून पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लो झाले. धरण क्षेत्रात कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे धरणाचा सांडवा आणि विद्युतगृहातून कडवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जुलैअखेर धरण तुडुंब भरल्याने कडवी काठच्या २२ गावांतील बळीराजासह नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. गेल्या २४ तासांत ५८ मिमी पावसाची नोंद झाली असून, आजअखेर एकूण १,९०३ मिमी पाऊस पडला आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद ८७० क्यूसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे, तर विद्युतगृहातून ५२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात सुरू असल्याची माहिती शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली.
कडवी धरणाची एकूण साठवण क्षमता २.५१ टीएमसी (७१.२४ द.ल.घ.मी.) असून सध्या धरण ६०१.२५ मीटर या पूर्ण पातळीवर पोहोचले आहे. या पाण्यावर परळे निनाई, भेंडवडे, लोळाणे, पुसार्ले, मलकापूर, पेरिड, शिंपे, सावर्डे यांसारख्या २२ गावांची शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थेट अवलंबून असतो. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे यंदा मे अखेर ३० टक्के पाणीसाठा शिल्लक होता, ज्यामुळे ऐन उन्हाळ्यात एकदाही उपसाबंदी करण्याची वेळ आली नव्हती.
नदीकाठच्या गावांना ‘अॅलर्ट’; पर्यटकांना बंदी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने कडवी नदीपात्रातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभागाने (उत्तर) कडवी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी धरण परिसर ‘निषिद्ध क्षेत्र’ घोषित करण्यात आला असून तेथे पर्यटकांना येण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे.- खंडेराव गाडे, शाखा अभियंता कडवी धरण