Shahuwadi Harshwardhan Patil UPSC Success
कोल्हापूर: जिद्द, चिकाटी आणि एकत्र कुटुंबाच्या भक्कम पाठबळावर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील तुरुकवाडी येथील सुपुत्र हर्षवर्धन हरिश्चंद्र पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ३४९ वा रँक मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील युवकांसमोर त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
हर्षवर्धन यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या श्रीराम विद्यालय येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण श्री शाहू छत्रपती विद्यालय (जुना बुधवार पेठ) येथे पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी विवेकानंद कॉलेजमधून ११ वी आणि १२ वीचे शिक्षण घेतले. तांत्रिक शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी केआयटी (KIT) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. स्पर्धा परीक्षेत उतरण्यापूर्वी त्यांनी पुण्यातील 'टीसीएस' (TCS) या नामांकित कंपनीत एक वर्ष सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी केली. मात्र, प्रशासकीय सेवेत जाऊन समाजाची सेवा करण्याचे ध्येय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.
हर्षवर्धन यांच्या या यशात त्यांच्या ४० जणांच्या मोठ्या एकत्र कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे वडील प्रा. डॉ. हरिश्चंद्र पांडुरंग पाटील हे निवृत्त प्राध्यापक आहेत, तर आई गृहिणी असून त्यांच्या संस्कारांच्या शिदोरीवरच हर्षवर्धन यांनी हे यश संपादन केले आहे. कुटुंबातील मोठ्या भावांचे मार्गदर्शन या प्रवासात दिशादर्शक ठरले. निवृत्त पॅरा कमांडो श्री. संजय पाटील यांनी घरातील १० भावंडांच्या शिक्षणासाठी अथक मेहनत घेतली, तर प्रा. अजय पाटील यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे अभ्यासाची अचूक दिशा सापडल्याचे हर्षवर्धन यांनी आवर्जून सांगितले.
हर्षवर्धन आणि त्यांचा जुळा भाऊ हे दोघेही एकाच वेळी या परीक्षेची तयारी करत होते. एकमेकांना अभ्यासात केलेली मदतीमुळे हा कठीण प्रवास सुसह्य झाला. या यशामुळे हर्षवर्धन यांच्यावर कोल्हापूर जिल्हा आणि शाहुवाडी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलांनी स्वप्न पाहिले आणि त्याला मेहनतीची जोड दिली, तर काहीही अशक्य नाही, हेच हर्षवर्धन यांनी सिद्ध केले आहे.
माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांना आणि माझ्या मोठ्या भावांना जाते. आईने दिलेले संस्कार आणि वडील बंधूंच्या मार्गदर्शनामुळेच मी कठीण काळातही डगमगलो नाही. आमच्या ४० जणांच्या कुटुंबाचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे.— हर्षवर्धन पाटील