गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा
पश्चिम घाटासह आजरा तालुक्यात कोसळणार्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील भडगाव पूल पुन्हा पाण्याखाली गेल्याने चंदगडशी होणारा थेट संपर्क तुटला आहे. तर पूर्वेकडील जरळी बंधार्यावरही फुटभर पाणी आल्याने पूर्व भागातील गावे संपर्कहीन झाली आहेत.
पश्चिम घाटात जोराचा पाऊस सुरु असल्याने हिरण्यकेशी, घटप्रभा नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील ऐनापूर व निलजी हे बंधारे चार दिवसांपासून पाण्याखालीच आहेत. दोन दिवसांपूर्वी भडगाव पुलावर पाणी आल्याने दिवसभर वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी पाणी उतरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली होती. सोमवारी सायंकाळी भडगाव पुलाच्या स्लॅबला पाण्याचा स्पर्श होत होता. दरम्यान आज सकाळपासून पाणीपातळी वाढून पुलावर पाणी आले. त्यामुळे दुपारी बारानंतर येथील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दुपारनंतर सुट्टी देण्यात आली आहे.
तालुक्याच्या निम्म्या भागासह चंदगड तालुक्याशी होणारा थेट संपर्क तुटला असून, एसटीसह अवजड वाहने आजरामार्गे तर हलकी वाहने हारुर बंधारामार्गे सोडली जात आहेत. हलक्या वाहनांची संख्या वाढल्याने हारुर मार्गावर वाहतुकीची समस्या उद्भवू लागली आहे. दरम्यान सीमाभागातील नांगनूरच्या पुलावर पाणी आल्याने संकेश्वर पोलिसांनी वाहतूक बंद केली होती. आजरा तालुक्यातील बर्यापैकी पाणी प्रकल्प तुडुंब झाले असून, नदीच्या पाणीपातळीत वाढ सुरुच आहे.