Flood threat to Kolhapur
अलमट्टी : धरणात मंगळवारपर्यंत 91 टीएमसी म्हणजेच 74.70 टक्के पाणीसाठा होता. पुढील काळात पडणारा पाऊस व धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता सध्या एवढा पाणीसाठा ठेवणे अपेक्षित नाही.  Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूरला महापुराचा धोका; ‘अलमट्टी’तून विसर्ग वाढवा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अलमट्टी धरणात ऑगस्टअखेर जेवढा पाणीसाठा ठेवला पाहिजे तेवढा पाणीसाठा आताच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका निर्माण झाला असून, अलमट्टीचा पाणीसाठा कोल्हापूर व सांगलीच्या मुळावर येण्याची चिन्हे आहेत. अलमट्टी धरणातून मंगळवारी रात्रीपासून 1 लाख 70 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, कोल्हापूर, सांगलीचा महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून 2 लाख 50 हजार क्युसेकने विसर्ग करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कोल्हापूर, सांगलीला असणारा महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग वाढविण्याची मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अलमट्टी धरणात नियम धाब्यावर बसवून पाणीसाठा केला जात आहे. पावसाळा संपताना जेवढी पाणी पातळी धरणात असायला हवी, तेवढा पाणीसाठा या धरणात आताच करण्यात आला असून, त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यासाठी महाराष्ट्रसरकारने कर्नाटक सरकारशी संपर्कात राहून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची मागणी केली होती.

सध्या पंचगंगा, कृष्णा, वारणा व कोयना धरण क्षेत्रात अतिमुसळधार वृष्टी सुरू असून, त्यामुळे नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. कोल्हापुरात राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी 41 फूट 5 इंचांवर पोहोचली आहे. पंचगंगा सध्या इशारा पातळीच्या दीड फुटावरून वाहत असून, आणखी दीड फुटाने पाणी पातळी वाढल्यास नागरी भागात पाणी शिरणार आहे. कोल्हापुरात प्रशासनाने पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू केले असून, त्यातून महापुराचा धोका वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाणीसाठ्याचे निकष धाब्यावर

अलमट्टी धरणात पाणीसाठा करण्याबाबतचे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. 31 मेपर्यंत धरणात 10 टक्के एवढाच पाणीसाठा असायला हवा. 31 जुलैअखेर धरणात 50 टक्के पाणीसाठा ठेवला पाहिजे. 31 ऑगस्टअखेर 77 टक्के पाणीसाठा ठेवला पाहिजे, असे केंद्रीय जलसंसाधन आयोगाचे निकष आहेत. अलमट्टी धरण हे 123 टीएमसी क्षमतेचे आहे. धरणाची उंची 519.6 मीटर आहे. सध्या धरणात 91 टीएमसी म्हणजेच 74.70 टक्के पाणीसाठा आहे. धरणात 517.58 मीटरपर्यंत पाणीसाठा करण्यात आला आहे. एवढा पाणीसाठा ठेवणे अपेक्षित नसल्याने अलमट्टीतून होणारा विसर्ग 3 लाख क्युसेक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT