Chandrakant Patil On Gokul Politics: महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर त्यांनी कोल्हापुरातील गोकुळ निवडणुकीवर देखील भाष्य केलं. कोल्हापुरात गोकुळच्या निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी असं न लढता बिनविरोध करण्याच्या दृष्टीकोणातून संचालकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी भाजपला वगळून देशाचं राजकारण होत नाही तर गोकुळचं कसं होईल असं वक्तव्य केलं. त्यांनी बिनविरोधची हवा काढून घेत गोकुळमध्ये महायुती म्हणूनच लढणार असे अप्रत्यक्ष संकेत दिले.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना गोकुळच्या राजकारणात भाजपला वगळून काही होणार नाही असे स्पष्ट सांगितलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'या देशात भाजपला वगळून कोणतंच राजकारण होत नाही. मग ते गोकुळचं कसं होईल. आता कुठं सुरूवात झाली आहे. थोडं थांबा सगळं होईल.'
पत्रकारांनी भाजपच्या नेत्यांना वगळून गोकूळचे संचालक भेटीगाठी घेत आहेत त्यांचा बिनविरोधचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी गोकूळची निवडणूक ही महायुती म्हणून लढणार आणि बिनविरोध निवडणूक होणार असेल तर महायुतीचे सर्व नेते बसून निर्णय करतील.'
चंद्रकांत पाटील यांना मुंबईतील मोहित कांभोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे उपस्थित होते याबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी उत्तर देणं टाळले. त्यांना ठाकरे आणि भाजप जवळ येत आहेत का असं विचारलं असता त्यांनी, माझा प्रॉब्लेम झालेला आहे की मी माझ्या विषयाच्या बाहेरच बघत नाही. ही माझी समस्या आहे आणि बलस्थान देखील आहे. आपल्याला दिलंय ते करा. मोहित कांबोज राहतात कुठे... त्याच्या मुलाची पार्टी की मुलीची पार्टी मग आले कोण का आले काय करायंचय आपल्याला.. असं म्हणत उत्तर देणं टाळलं.