

MP Vishal Patil on BJP Defeat
विटा : सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव झाला असून जिल्ह्यातील दहा पैकी सहा तालुक्यांत त्यांचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतही मतदार भाजपला नाकारतील, त्यामुळे भाजपने आता पराभवाची सवय करून घ्यावी, असे वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी केले.
विटा येथे आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी खासदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सांगली जिल्हा परिषदेतील संभाव्य सत्ता समीकरणे आणि अध्यक्षपदाच्या निवडीबाबत त्यांनी भाष्य केले.
पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट सर्वात कमी राहिला आहे. भाजपचे केवळ १६ सदस्य निवडून आले आहेत. याउलट महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अधिक संख्येने विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून तसेच सत्तेचा वापर करूनही अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. पालकमंत्र्यांनी ३५ जागा जिंकू असे सांगितले होते; मात्र २० जागादेखील मिळाल्या नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. काही ठिकाणी महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती झाल्या आणि काही ठिकाणी चुका झाल्या. त्या टाळल्या असत्या तर आणखी जागा वाढल्या असत्या, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत बोलताना पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात चर्चा सुरू आहे. तसेच काही ठिकाणी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि सुमित्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाचे सदस्यही सोबत आहेत. एकूण मिळून आमची संख्या सुमारे ४३ पर्यंत जात असल्याने सत्ता स्थापनेत अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येत्या १८ मार्च रोजी होणाऱ्या निवडीपूर्वी १६ किंवा १७ मार्चला सर्व नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील, असेही पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यातील भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.